पुणे, दि. २ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील दहा जागांवर आमचे विशेष लक्ष असेल. गेल्या निवडणुकीपेक्षा आता समीकरणे बदललेली आहेत. त्यामुळे पक्षाने मला बारामतीत जाऊन राहायला सांगितले आहे, असे भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (मंगळवार) येथे बोलताना सांगितले.
महायुतीचे पुण्यातील लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट व बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पाटील बोलत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकारण जातीय आणि फोडाफोडीचे आहे. काँग्रेस राज्यात उरलेली नाही, ती कोणी संपवली यावर वेगळी चर्चा होऊ शकते, असेही पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान, भाजपने बारामतीत सुप्रिया सुळे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करून त्यांची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे.