सांगली, दि. १० (पीसीबी) – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपला जीव धोक्यात घालून कृष्णा नदीच्या महापुरात आठ दिवसांपासून अडकलेल्या तिघांचे प्राण वाचवले. कृष्णेच्या रौद्र रूपापुढे सदाभाऊंची मदत यशस्वी झाल्याने बहे व वाळवा तालुक्यातील नागरिकांकडून सदाभाऊंच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
बहे (ता. वाळवा जि. सांगली) येथील रामलिंग बेटावर अडकलेल्या पुजारी (अनिल सिताराम बडवे वय ६५, सुमन अनिल बडवे वय ५५ व त्यांची नाथ मोहिनी कुलकर्णी वय २०) कुटुंबासाठी खोत देवदूत ठरले.
रामलिंग बेटाकडे जाण्याचा जलमार्ग खडतर होत होता. रामलिंग बेटावर अडकलेले लोक भयभीत झाले होते. सदाभाऊंनी व्हाईट आर्मीच्या लोकांना बोटीत बरोबर घेऊन ओढ्यामार्गे बहे गावाला वेढा टाकत अडथळे पार करत नदीचे मुख्य पात्र गाठले. नदीच्या तीव्र प्रवाहाच्या उलटे जात ३ किलोमीटर जात बोटीतून सदाभाऊंनी रामलिंग बेट गाठून त्या दोन महिला व पुजाऱ्याला घेऊन सुरक्षितस्थळी आले.