जळगाव दौऱ्यादरम्यान फडणवीसांनी घेतलेल्या भेटीवर अखेर खडसेंनी मौन सोडलं; म्हणाले, देवेंद्र….

0
391

मुंबई, दि.०७ (पीसीबी) : जळगाव दौऱ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिली आणि राजकीय वर्तुळात वेवेगळ्या चर्चांना उधाण आलं. कारण, भाजपा सोडताना गंभीर आरोप केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे यांच्या घऱी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या भेटीवर बोलताना एकनाथ खडसे आमचे पालकच असल्याची प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान एकनाथ खडसे यांनीदेखील फडणवीसांच्या या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान एकनाथ खडसे म्हणाले कि, “मी विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस माझ्याकडे १२-१८ तास राहायचे. जेवणही माझ्याकडे करायचे… झोपायचेही. देवेंद्र फडणवीस त्या कालखंडात माझ्या बी-४ बंगल्यावर बऱ्याचदा असायचे. मुख्यमंत्री म्हणूनही ते माझ्याकडे जळगाववला मुक्ताईनगरला आले होते. माझ्याकडे सूत गिरणीचं, साखर कारखान्याचं उद्घाटन झालं तेव्हा ते येऊन गेले होते”.

पुढे दरम्यान एकनाथ खडसे सरकार पडणार असल्याच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले कि, “आमचं सरकार येणार आहे, थोडे दिवस थांबा हे सरकार पडणार आहे अशा स्वरुपाचं आमदारांना सांगून दिवस काढत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.“आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे. कारण मीच त्यातील अनेकांना प्रवेश तसंच तिकिट दिलं होतं. माझ्याशी ते मोकळेपणाने बोलतात. जी कार्यपद्धती आहे त्याबद्दल नाराजी जाहीर करतात. असे लोक पक्षाबाहेर जाऊ नये किंवा नाराजांची संख्या वाढू नये त्यासाठी कदाचित अशी वक्तव्यं केली जात असतील,” अशी शंका एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे.

१ जून रोजी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. रक्षा खडसे यांनी फडणवीसांच्या भेटीबद्दल बोलताना सांगितलं होतं की, “फडणवीस पहिल्यांदाच घरी आले असं नाही, याआधीही ते अनेकदा आमच्या घऱी येऊन गेले आहेत. राजकारण राजकारणाच्या जागी असून आमचे संबंध चांगले आहेत. एकनाथ खडसे यांचंही त्यांच्याशी बोलणं झालं. भाजपाची खासदार असताना नेते आल्यानंतर त्यांना घरी बोलावणं आणि चहा पाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे”.