आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे

0
284

मुंबई, दि.०७ (पीसीबी) : राज्यात कोरोनाच संकट दिवसेंदिवस दाट होत असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करताना दिसत आहेत.वारंवार महाविकास आघाडी सरकार पाडण्याची भाजपा नेत्यांकडून वक्तव्यं केली जात असून तर्हेतर्हेची भाकीतंही वर्तवली जात आहे. येत्या काही महिन्यात सरकार पडणार असल्याचे दावे भाजपा नेत्यांकडून केले जात आहेत. दरम्यान भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणाऱ्या एकनाथ खडसे यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.

खडसे म्हणाले कि, “आमचं सरकार येणार आहे, थोडे दिवस थांबा हे सरकार पडणार आहे अशा स्वरुपाचं आमदारांना सांगून दिवस काढत आहेत,” अशी टीका त्यांनी केली. “आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे. कारण मीच त्यातील अनेकांना प्रवेश तसंच तिकिट दिलं होतं. माझ्याशी ते मोकळेपणाने बोलतात. जी कार्यपद्धती आहे त्याबद्दल नाराजी जाहीर करतात. असे लोक पक्षाबाहेर जाऊ नये किंवा नाराजांची संख्या वाढू नये त्यासाठी कदाचित अशी वक्तव्यं केली जात असतील,” अशी शंका एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे.