जगातील सर्वात मोठ्या लसिकरण मोहिमेचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे आवाहन, म्हणाले…

0
236

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – गेल्या अनेक महिन्यांपासून देशवासीयांच्या नजरा लागलेल्या कोरोना लसीच्या वापराला अखेर आजपासून सुरूवात झाली. बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांचं अभिनंदन करत संबोधित केलं. पंतप्रधान म्हणाले,”काही वेळात देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. यासाठी मी देशवासीयांचं अभिनंदन करतो. ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सगळ्यात आधी कोरोना लस मिळेल,” असं मोदी म्हणाले. कोरोना काळात ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बलिदान द्यावे लागले त्यांच्याप्रति मोदी यांनी सद्भावना व्यक्त केली. देशातील शास्त्रज्ञ आणि तज्ञांनी एखाद्या ऋषी प्रमाणे लस बनविण्यासाठी जे योगदान दिले त्याचाही मोदी यांनी आवर्जुन उल्लेख केला.

लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी मोदी म्हणाले,”भारतातील लसीकरण अभियान मानवीय आणि महत्त्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे ज्या सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सर्वात आधी लस दिली जाईल. देशात एकाच वेळी दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे.

दोन डोस अत्यंत आवश्यक –
पंतप्रधान मोदी म्हणाले, ”मी समस्त देशवासियांना या गोष्टीची पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छित आहे की, कोरोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला डोस घेतला व नंतरचा डोस घेणं विसरले, अशी चूक करू नका. जसे की तज्ज्ञं सांगत आहेत, पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये जवळपास एक महिनाचे अंतर ठेवले जाईल. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे, दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यानंतरच तुमच्या शरिरात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठीची आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. त्यामुळे लसीकरण होताच तुम्ही बेजबाबदारपणे वागायला लागला, मास्क काढून ठेवलं, सुरक्षित अंतर ठेवणं विसरलात…तर काही उपयोग होणार नाही. मी विनंती करतो की असं करू नका.”

तसेच, मी तुम्हाला आणखी एख गोष्ट अत्यंत आग्रहाने सांगू इच्छित आहे की, ज्या प्रकारे धैर्याने तुम्ही कोरोनाशी लढलात. तसेच, धैर्य आता लसीकरणाच्यावेळी देखील दाखवायचं आहे. असं आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी देशवासियांना केलं.