बारामती, दि. ८ (पीसीबी) – काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांना प्रवेश देणाऱ्या भाजपवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. चौकशीची भीती दाखवून काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते भाजपने पळवले, असे पवार यांनी म्हटले आहे. तसेच निवडणुकीत साम दाम दंड या नितीची वापर भाजपकडून सुरू असल्याचा आरोप पवारांनी केला.
श्री क्षेत्र कण्हेरी येथे राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज (सोमवार) करण्यात आला. या प्रसंगी झालेल्या मेळाव्यात पवार बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले की, भाजपने सर्वच ज्येष्ठ नेत्यांना घरची वाट दाखवली आहे. पक्षात लोकशाही नाही तर हुकूमशाही आहे, हे मोदी शहांनी दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद नीतीचा वापर भाजपकडून केला जात आहे, असा आरोप पवार यांनी भाजपवर केला.