‘चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसाठी केंद्र सरकार महाराष्ट्रालाही मदत करणार पण…..’

0
217

मुंबई, दि.२० (पीसीबी) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर आरोप केला आहे कि, “तौते चक्रीवादळग्रस्त आठही राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यात महाराष्ट्राला सुद्धा मदत मिळणार, हे कालच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. पण, याबाबत जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे.”

“या चक्रीवादळाचा लॅण्डफॉल हा गुजरातमध्ये झाला. ४५ जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि खूप मोठ्याप्रमाणात गावं उध्वस्त झाली. म्हणून काल पंतप्रधान मोदी त्या ठिकाणी गेले, त्यांनी पाहणी करून त्या ठिकाणी मदत घोषित केली. त्या मदतीची जी प्रेस नोट आहे त्यातच उल्लेख केलेला आहे, की अन्य राज्यांना देखील यामध्ये मदत होणार आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दोन केंद्रशासित प्रदेश इतक्या राज्यांमध्ये नुकसान झालेलं आहे. कालची घोषणा झाल्यानंतर इतर कुठल्याही राज्याने त्या बद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्या सगळ्यांनी ते वाचलेलं आहे. की केंद्र सरकार सगळ्या राज्यांना मदत करणार आहे. आता यामध्ये केरळ किंवा तामिळनाडू ही तर भाजपाची राज्य नाही किंवा आपण दुसरा विचार केला, तर गोवा व कर्नाटक ही भाजपाची राज्य आहेत. तरी देखील काल घोषणा गुजरातची झाली आहे. या सगळ्या राज्यांना मदत मिळणार आहे. एवढच नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एसडीआरएफ हा राज्याकडे असतो, केंद्र सरकार एनडीआरएफमधील एसडीआरएफमध्ये पैसे अगाऊ देतं. ते आपल्याला मिळालेले आहेत आणि एसडीआरएफमधून अशाप्रकारच्या कुठल्याही वादळात किंवा घटनेत राज्य सरकारने मदत करायची असते आणि पुन्हा ते जे पैसे राज्य सरकारने वापरले. ते केंद्र सरकार परत करत असतं किंवा नव्याने देत असतं, केंद्र सरकारचेच ते पैसे असतात. हे सगळं राज्याला माहिती आहे, असं असतानाही यावर जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे. राज्याला निश्चितपणे मदत केंद्र सरकार करेल. आठही राज्यांना करेल व महाराष्ट्राला होईल”, असा दावा फडणवीसांनी केला आहे.