‘पत्रकारांनो तुम्ही रूग्णांच्या नजरेत खलनायक, गिधाड झाले आहात’ – अभय खैरनार (पत्रकार- हिंदूस्थान टाईम्स, पुणे)

0
344

 –  (मुक्काम पोस्ट कोवीड हॉस्पिटल) 

पिंपरी, दि.२० (पीसीबी) : कोविडची दुसरी लाट मार्च पासून सुरु झाली. तेव्हापासुन मी आणि माझे कुटुंब याचे शिकार झालो. १० मार्च २१ ला सुरू झालेला हॉस्पिटल चा प्रवास १४ मे २१ ला संपला. या ६५ दिवसाच्या कालावधीत माणसे आणि हॉस्पिटल बदलत गेली पण कुटुंबातील कोणीतरी एकजण हॉस्पिटलमध्ये होता. या काळात मी स्वतः मार्च मध्ये आठवडाभर वेगळ्या ऑपेरेशन साठी दिनानाथ मंगेशकरला दाखल होतो. २५ एप्रिललाा मला कोविड झाल्याने महापालिकेच्या बाणेर हॉस्पिटलला चार दिवस आणि घरी आल्यावर पुन्हा त्रास झाल्याने पंधरा दिवस राव नर्सिंग होम असा २७ दिवस रूग्णालयात राहिलो . सरकारी, खासगी, isolation, oxygen आणि ICU Bed सगळयांचा अनुभव घेतला आणि रोज मनात असो किंवा नसो या काळात अनेक कोवीड रूग्णांसोबत संवाद घडत गेला. सोबत वेगवेगळ्या कालावधीत घरातील सातजण Positive झाले. त्यापैकी चार जणांना दाखल करावे लागल्याने, रुग्णाच्या नातेवाईकाची मानसिकता काय असते ते पण अनुभवयला मिळाले. त्या अनुभवावर आधारित हे लेखन किंवा डायरी
-अभय खैरनार (पत्रकार, हिंदुस्थान टाइम्स, पुणे)

हो, मी स्वतः पत्रकार असलो, तरी आताच्या परिस्तिस्थिमध्ये आपण खलनायक झालो आहोत हे वास्तव आपल्याला मान्यच करावे लागेल. संपादकीय विभागाला याचे चिंतन करावे लागेल आणि काही सकारात्मक बदल करावे लागतील. सत्ताधारी लोकांच्या नजरेत खलनायक ठरलो असतो तर पत्रकार म्हणून मला स्वतःला याचा अभिमान वाटला असता. पण वाईट याचे वाटते की, ज्यांच्यासाठी पत्रकारिता करायची त्या वाचक, प्रेक्षक आणि सर्वात महत्वाचे Pandamic मधील सगळयात फटका बसलेला आणि कोविड Positive रुग्णांच्या नजरेत पत्रकार खलनायक आणि गिधाड ठरले आहेत.

टीव्ही, ऑनलाईन, प्रिंट आणि social media वरील बातम्या – कोविड Positive रुग्णाला isolation bed वर असले तर oxygen bed वर पाठवत आहे. जे oxygen वर आहेत त्यांना ICU नाहीतर ventilator bed पाठवत आहे. पत्रकारितेवर एवढी वाईट वेळ आली की डॉक्टर लोकांना औषधा सोबत, बातम्या पाहू नका, वाचू नका हे सांगावे लागत आहे. पेशेंटचे पण सपोर्ट ग्रुप तयार होत आहेत आणि ते एकमेकाला बातम्या पाहू नका असा सल्ला देत आहेत.

आता Negative news कशी परिणाम करते ते सांगतो. मी ICU मध्ये बरा होत असताना हिंमत करून what’s app उघडले. इतर पोस्ट वाचत असताना अचानक मिडिया संबंधित गु्पवर पोस्ट वाढल्याने, माझ्या कडून ऊत्सूकतेपोटी क्लिक केल्या गेल्या. बातमी होती हडपसरचे बातमीदार जगदाळे यांचे निधन. अंगावर सरकण काटा आला. जो तो फोटोला Tag करून आदरांजली वाहत होता. मला सेवलेकर प्रकरण माहित असल्याने माझ्या मानसिकतेवर जो आघात व्हायचा तो झाला होता. माझी Monitor वरील O2 level 92 वरुन सरकण खाली येऊन 79 झाली. तेवढ्यात नर्सचेपण Monitor कडे लक्ष गेले आणि ती धावतच आत आली. काय झाले विचारले आणि अंगाला लावलेल्या Heart beat च्या वायर काढून पोटावर झोपायला सांगितले. तिनेच O2 supply 6 liter वरून 10 liter केला. शांत पडून रहा सांगून तिच्या जागेवर जाऊन काचेतून Monitor पहात राहिली. वीस मिनिटांनी माझी O2 level- 92-94 स्थिर झाली. नंतर तिने पुन्हा O2 supply 6लिटरला पूर्ववत केला. अजून जेव्हा मी बरा होऊन घरी आलो तर पहिल्या सकाळी खासदार राजीव सातव यांच पोस्ट कोविड निधन बातमी. ती बातमी द्यायची तर अशी स्पर्धा लागली की लोकांनी Personal chat वर मला टाकली. त्याचा परिणाम व्हायचा तो झालाच. पण कुटुंबीय समोर दिसत असल्याने लगेच सावरलो.

मी पत्रकारांची बाजू जाणतो तसा रुग्णांची पण बाजू प्रत्यक्ष अनुभवून आलो आहे. मी ऍडमिट असताना तर काही हुशार डॉक्टर आणि नर्सेसने माझाच बातम्या पाहू नका हे सांगण्यासाठी वापर करून घेतला. हे बघा पत्रकार असूनपण news पासून लांब राहा सांगतात, आता तुमची मर्जी मोबाईल वर बातम्या पाहायच्या किंवा क्रिटिकल वाहायचे असे इतर पेशंटला सांगायचे. विशेष म्हणजे या काळात ज्या संपादकांना, पत्रकार सहकार्यांना माझ्या तब्बेतीबाबत समजत गेले आणि ज्यांचे फोन आले त्यांनी पण मला आवर्जून सल्ला दिला – नो news, अजिबात पाहू नको, वाचू नको. आता मला प्रश्न पडतो आपण स्वतःच मान्य करतो की एवढी निगेटिव्हिटी पत्रकारिते मध्ये आली आहे, तर आपण किमान पँडेमिक पुरता तरी काही सकारात्मक बदल करू शकतो का?
माझा या काळात किमान शंभर रुग्णांसोबततरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संवाद झाला असावा, कारण मला सेपरेट रूम कधी मिळूच शकला नाही. नावाला semi private room मिळाला, रुग्ण संख्याच एवढी होती की, एका रूम मध्ये चार ते पाच रुग्ण असायचे. किमान हॉस्पिटलच्या बेडवर असताना, रुग्ण जे बोलतात ते प्रामाणिक आणि सत्य बोलतात. त्यामुळे एवढ्या sample size वरून, मी नक्कि सांगू शकतो की, हो तुमचा हेतू नसला तरी तुम्ही ज्यांच्यासाठी पत्रकारिता करतात, त्यांच्या नजरेत खलनायक झाला आहात. यात इलेक्ट्रॉनिक वाले जास्त खलनायक असले तरी, प्रिंट – online आणि social media वाले यांच्याबाबत पण तोच राग आहे.

पत्रकारांनी पँडेमिक मध्ये योग्य काम केले आहे, देशाचा राजा आणि प्रधान नागडा आहे, हे लोकांना पटले आहे. विमान बंद करण्यात उशीर, मजुरांची पायपीट, कुंभमेळा, पश्चिम बंगाल च्या निवडणुकीतला बेदरकारपणा आणि कळस म्हणजे लसी योग्यवेळी खरेदी न करणे, बाहेर लस पाठवून देशवासियांना मृत्यच्या खाईत लोटणे हे सगळे सामान्य लोक बोलायला लागले आहेत. कदाचित गैर भाजपा सरकार असते तर, त्या पक्षाच्या नेत्यांनी आणि मंत्रांनी राजाला जाहीर सुनावले पण असते. पण दुर्दैवाने जोडगळी पार्टीपेक्षा मोठी झाल्यानें, भाजपामध्ये एकाही नेत्याला राजाला सांगायची हिम्मत नाही.

पत्रकारिते मध्येदेखील भाजपा – नॉन भाजपा अशी उभी दुफळी पडली असली तरी, किमान हे वास्तवं ऐकून पँडेमिक पुरत्या काही सुधारणा होण्याची अपेक्षा असल्यामुळे हा लेखनप्रपंच.

देश पातळीवर काही होईल की नाही माहित नाही पण किमान पुणे आणि महाराष्ट्रामध्ये नक्की आपण काही चांगले बदल करू शकतो. social मीडिया आणि लहान online पोर्टल वाल्याकडून अपॆक्षा नाही, पण प्रमुख चॅनेल, वृत्तपत्र आणि ऑनलाईन टीम मधील वरिष्ठानी थोडे चिंतन केले तर पँडेमिक पुर्ततरी आपण काही मांडणीत बदल करून सगळ्यात affected घटकाला जो कोविड positive झाला आहे त्याला दिलासा देऊ शकतो किंबहुना काही positive बातम्या देऊन त्याच्या बरे होण्याच्या लढाईत मदत करु शकतो

आता पुढचा प्रश्न संपादक किंवा वरिष्ठ पत्रकार एकत्र येतील का, आणि आलेतर एकमत होईल का तर याचे उत्तर सगळ्या पत्रकारांना माहित आहे. पण प्रत्येक मीडिया house ने किंवा त्यांच्या संपादकीय टीमने विचार केला तर हे लगेच होऊ शकते. चॅनेल मध्ये संपादकीय पेक्षा जे लोक बॅकग्राऊंड साऊंड लावतात, सादरीकरण करताना जे रंग वापरून बातम्या अंगावर आणतात त्यांची मानसिकता बदलावी लागेल. आकाशवाणी च्या बातम्या कितीही negative असल्या तरी लोकांची मानसिकता बदलत नाही. किंवा काही आंतरराष्ट्रीय चॅनेल ज्या सौम्यपणे news सादर करतात त्यांचे अनुकरण करावे लागेल.

अजून चर्चा होऊ शकते की आम्ही थोड्या बातम्या घडवतो? जगात, देशात, राज्यात, शहरात घडते, ते दाखवतो. वास्तव घडते ते दाखवायचे नाही का? सरकारला धारेवर धरायचे नाही का ?

पण ही शंभर वर्षात घडणारी घटना आहे. मानवजातीवर आलेले हे संकट आहे. युद्ध चालू असताना रोज जेवढे मृत्यू होत नसतील, त्याच्या जास्त प्रमाणात रोज लोक मरण पावत आहेत. कारगिल युद्ध सुरु असताना जेवढे जवान शहीद होत होते, तेवढे लोक काही शहरात, राज्यात मरत आहेत. युद्धच्या वेळी केंद्र सरकार जसे राष्ट्रीय आणीबाणी म्हणून लढते , तसे काही पावले उचलताना दिसत नाही. प्लेग किंवा स्पॅनिश फ्लू च्या वेळीचा माध्यमांचा वेग आणि आताचा मीडियाचा scale याचा पण विचार करावा लागेल. स्पॅनिश फ्लू च्या वेळी इतर शहरात काय होते याचा परिणाम दुसर्या शहरातील नागरिकांवर होत नसेल किंवा कळत पण नसेल. आता दुसर्या मिनिटाला तुम्हीच तयार केलेली बातमी, social media वर तुमच्या मोबाईल वर वेगवेगळ्या group वर येऊन पडते. दिल्ली मध्ये झालेल्या मृत्यांच्या आकडयाने, पुण्यातील नागरिकांच्या मानसिकतेवर लगेच परिणाम होतो. पहिला lockdown असताना Italy च्या बातम्या ऐकून इथे आपण घाबरत होतो

आता आपण पत्रकार म्हूणन काय बदल करू शकतो याच उत्तर माझ्या कडे नाही किंवा माझा एवढा आवाकापण नाही, हे मला प्रामाणिकपणे मान्य करावे लागेल. पण आपण संगळयानी चिंतन केले, तर नक्की काही उत्तर सापडू शकतात आणि ते लगेच अमलात आणून जनमानसात झालेली प्रतिमा बदलवू शकतो.

मला सुचवावेसे वाटलेले काही पर्याय
– सध्या राजकीय कार्यकर्ते आणि नेते पत्रक काढून एकमेकांवर आरोप करत आहेत. आंदोलन करून, पत्रकार परिषद बोलवून चिखलफेक करत आहे. त्याना माहित आहे याला प्रसिद्धी मिळते. आपण ते थांबवू या. त्याऐवजी जे राजकीय कार्यकर्ते विधायक काम लोकांसाठी करत आहे ते दाखवू या. याने कार्यकर्ते पण घडतील. नेत्यांनापण समजले की, कशाला महत्त्व मिळते, ते पण लोकांना मदत करतील, तसे राजकीय पक्षाचा कार्यक्रम आखतील.
यांच्या आंदोलन आणि पत्रामुळे ना उद्धव ठाकरे राजीनामा देणार किंवा मोदी जास्त लसी खरेदी करणार आहे. मग आपण सध्यातरी अशी प्रसिद्धी थांबवू या.

– रोज एकतरी positve बातमी आग्रहाने high light करायची- जशी की लासलगाव च्या चांगदेव होळकर यांनी २५ HRCT score आणि ८० पेक्षा जास्त वय असताना केलेली corona वर मात

– शासनाव्यतिरिक्त अनेक संस्था, छोटे ग्रुप चांगले काम करत आहेत त्या बात्माचे प्रमाण वाढवणे

– रोजचा positive , death रुग्णाचा score पत्रकारच तयार करतात आणि social media वर पाठवता, पुढच्या मिनिटाला राजकीय लोक खाली त्यांचे नाव टाकून ते गावभर फिरवतात. खरंच आता लोकांना याचा कंटाळा आला आहे. खूप व्हाट्स अँप ग्रुप वर तर corona related काही पोस्ट करण्यास मनाई करण्यात आली आहे. लोकांना नको असेल तर त्यांच्यावर अशे आकडेवारी लादण्यात काय समाधान आहे

– सगळयात जास्त बदल online आणि चॅनेल वाल्यानी करायची गरज आहे. वेळ पडल्यास त्यांनी हे बदल करताना मानसोपचार तज्ञ यांची मदत घ्यावी

– या सगळ्या आजारपणात मी जेव्हा काही दिवस ऑफिस जॉईन केले तेव्हा काही positive stories दिल्यात आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला. मराठी वेगवेगळे पेपर मध्ये आलेल्या news वाचून, शासन सोडून इतर known -unknown ग्रुप्स , संघटना कशा चांगले काम करत आहे ते एकत्र मांडले. शांतीलाल मुथा, जैन संघटना, हेल्प रायडर, मुस्लिम संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, काही राजकीय कार्यकर्ते – या बातमीचा एवढा चांगला परिणाम झाला की, मला लगेच दुपारी पुण्यातील दुसऱ्या इंग्लिश पेपर मधील management मध्ये काम करणारे अधिकारी यांचा फोन आला. तशी माझी बातमी काही ग्रेट नव्हती. इतर पेपरला आलेल्या तुकडे -तुकडे मी एकत्र आणले होते आणि त्या लोकांशी बोलून बातमी पुढे नेली होती. पण त्या अधिकाऱ्याला आणि त्याचे वडील याना ती बातमी एवढी भावली की , त्यांनी माझा नंबर शोधून मला फोन केला आणि अशा news ची आता गरज आहे , ते सांगितले. त्यांना अशा लोकांना चांगली आर्थिक मदतपण करायची होती पण मी त्यांना contact numbers देऊन मोकळा झालो आणि तुमीच योग्य कोण ते ठरवून मदत करा हे सुचविले.

चला तर मग सगळे मिळून काही प्रयोग करू यात, सरकारचे (सगळेच महापालिका , राज्यशासन, केंद्र सरकार) कान टोचत रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण करूया आणि त्यांना बरे होण्याची ऊर्जा देऊ यात