गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चीट,आयोगाकडून अहवाल सादर

0
387

मुंबई,दि.११(पीसीबी) –२००२ गुजरात दगंली प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना क्लीन चीट देण्यात आली आहे. २००२ दंगलीप्रकरणी नानावटी-मेहता आयोगाचा अहवाल गुजरात विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालात नरेंद्र मोदींसह इतर मंत्र्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. ‘गोध्रा ट्रेन जळल्यानंतर झालेल्या दंगली या पूर्वनियोजित नव्हत्या,’ असं नानावटी मेहता आयोगाने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील सरकारला क्लीन चीट देण्यात आली आहे. गोध्रा जळीतकांड आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशींसाठी नानावटी-मेहता आयोगाची स्थापना करण्यात आली होती.गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीत अनेक निरपराधांचा बळी गेला होता. या दंगीलवरूनच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना वारंवार टार्गेट करण्यात येतं. ही दंगल भडवण्यात तत्कालीन गुजरात सरकारचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला आहे.

साबरमती एक्स्प्रेसच्या ‘एस-६’ डब्याला २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्टेशनवर आग लावण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या डब्यात ५९ प्रवासी होते . या प्रकरणी एसआयटी कोर्टाने १ मार्च २०११ रोजी ३१ लोकांना दोषी ठरवले होते व ६३ जणांची निर्दोष सुटका केली होती. तसेच ११ दोषींना फाशीच तर, २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने ११ आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली होती. या आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्याऐवजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.