गाडी हळू चालविता येत नाही का, असे म्हणाल्याच्या कारणावरून मारहाण

0
242

पिंपळे गुरव, दि. १० (पीसीबी) – गाडी हळू चालविता येत नाही का, असे म्हणाल्याच्या कारणावरून आठ जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ओंकार कॉलनी, पिंपळे गुरव येथे रविवारी (दि. 8) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली.

ऋत्विक प्रशांत पेंदे व अशोक फुलचंद साळंके (वय 21, दोघेही रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह रोहन पाटील व इतर चार ते पाच इसम (नाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अजितकुमार केशव नायर (वय 47, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 9) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पुतणीचा वधू परीक्षणाचा समारंभ संपवून नवरा मुलगा व त्यांचे नातेवाईक यांना सोडविण्यासाठी बिल्डिंगच्या खाली आले. त्यावेळी आरोपीच्या दुचाकीचा धक्का लागला. गाडी हळू चालविता येत नाही का, असे फिर्यादी व त्यांचे मोठे भाऊ म्हणाले. या कारणावरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव केला. फिर्यादीसह त्याचा भाऊ व पुतणी यांना मारहाण केली. यात फिर्यादी व त्यांचा भाऊ हे दोघे जखमी झाले तसेच आरोपींनी फिर्यादीच्या पुतणीला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.