मुंबई, दि.२५ (पीसीबी) : देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालतेय. त्यामुळे केंद्र सरकार टीकेचे धनी बनतेय. आसएसएस आणि भाजपाच्या नेतृत्वामध्ये विचारमंथन सुरु असून केंद्र सरकार आणि भाजपशासित राज्यांची प्रतिमा सुधारण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना आवाहन केलं आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले कि,“मोहन भागवत आदरणीय आहेत. अनेक विषयावर त्यांनी परखडपणे मत व्यक्त करावं अशी आमची अपेक्षा असते. कारण त्यांच्या भूमिकेला, मताला या देशात आजही महत्व दिलं जातं. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. विशेषतः गंगेच्या प्रवाहात हजारो प्रेतं वाहून आली आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वाचा होता, राममंदिराइतकाच महत्वाचा होता. त्यावर या देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा जनतेला होती. देशात आज जे सगळं काही सुरु आहे त्यावर मोहन भागवत यांनी आपलं मत व्यक्त करावं.”
“राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आलेल्या १२ नावांची यादी अखेर सापडली आहे. फाईल मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. फाईलवर राज्यपाल सही करतील तेव्हा संपूर्ण राजभवनला आम्ही पेढे वाटू. फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवली नाही आणि भूतं असली तर त्यांच्या आसपास असावीत. उच्च न्यायालयाने फाईल वर अद्याप निर्णय का होत नाही असा प्रश्न विचारला आहे, ती फाईल बोफोर्स, राफेलची आहे का? भ्रष्टाचाराची आहे का? ही फाईल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने एकमतानं १२ सदस्यांची नावं दिलेली आहे. त्यावर आठ महिने निर्णय होत नसेल तर महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला ते शोभेसं नाही. राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी त्यांच्या कामात गतीमानता दाखवली तर महाराष्ट्राची परंपरा गतिमान राहील,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.