खडसे, बावनकुळे स्वतःलाच समजून सांगतील – चंद्रकांत पाटील

0
502

मुंबई, दि. ८ (पीसीबी) : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची नावे जाहिर करून लगेच त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक आहे. संख्याबळ पाहता भाजपने आपले 4 उमेदवार घोषित केले. मात्र निष्ठावंतांना डावलून, बाहेरुन आलेल्यांना तिकीट दिल्याचा आरोप, दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही तर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीच केला आहे. खडसेंनी स्वत:साठी उमेदवारी मागितली होती. मात्र तिकीट न मिळाल्याने खडसे चांगलेच संतापले आहेत.
भाजपने राष्ट्रवादीतून आलेले माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, धनगर नेते गोपीचंद पडळकर, तेली समाजातील नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे बालरोगतज्ञ डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्या सारख्या नेत्यांना डावलण्यात आले. भाजपने तिकीट दिलेल्या उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखल केले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, विनोद तावडे उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “विधान परिषद निवडणुकीसाठी 4 उमेदवार घोषित केले. चारही जणांनी अर्ज भरले. भाजपमध्ये राज्याने इच्छुकांची नावे पाठवणे, केंद्राने दिलेला दिल्लीत निर्णय पाठवणे, उमेदवार पार्शवभूमी सांगितली जाते. त्यामुळे उमेदवारीबाबत केंद्राने घेतलेला हा निर्णय आहे. त्यांनी आगामी काळात विचार केला असेल. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा ताई यांच्याबद्दल केंद्राने काही विचार केला असेल. हे सगळे इतके चांगले कार्यकर्ते आहेत हे तिघेही समजूतदार असतील, ते स्वतःच स्वतःला समजावून सांगतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.