कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार

0
214

चेन्नई, दि. २६ (पीसीबी) : देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. याची मद्रास उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन थेट निवडणूक आयोगालाच फटकारले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे, असा संताप मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केला आहे.

मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी एका सुनावणीवेळी हा संताप व्यक्त केला. देशभरात कोरोनाची दुसरी लाट येत असताना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक रॅली काढण्यास परवानगी दिली. तुमची संस्था कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहे, असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. लाईव्ह लॉ या संस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

येत्या 2 मे रोजी पाच राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी योग्य धोरण आखलं नाही तर आम्ही तात्काळ प्रभावाने मतमोजणी थांबवू, असा इशाराही न्यायालयाने आयोगाला दिला आहे. पाचही राज्यांमध्ये हजारोंच्या निवडणूक रॅली होत असातना तुम्ही परग्रहावर होता काय? असा खरमरीत सवालही कोर्टाने निवडणूक आयोगाला विचारला.

लोकांचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. संवैधानिक पदांवरील लोकांना अशा गोष्टींचं स्मरण करुन द्यावं लागतं हे दुर्देव आहे. जेव्हा एखादा व्यक्ती जिवंत असेल तरच तो त्याच्या लोकशाही अधिकारचा लाभ उठवू शकेल ना? असा संतप्त सवालही कोर्टाने केला आहे. आजची परिस्थिती ही अस्तित्व आणि सुरक्षेची आहे. त्यानंतर सर्व काही येतं, असंही मुख्य न्यायाधीशांनी स्पष्ट केलं आहे. सुनावणीवेळी आरोग्य सचिवांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने 30 एप्रिलपर्यंत मतमोजणीसाठी कोविड प्रोटोकॉलबाबत काय उपाययोजना करणार आहेत, त्याची माहिती देण्याचे आदेशही दिले.