कोणा तिसऱ्या व्यक्तीमुळे आमचा घटस्फोट झाला नाही- दिया मिर्झा

0
470

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने पती साहिल संघापासून विभक्त झाल्याचे गुरुवारी सोशल मीडियावर जाहीर केले. त्यानंतर बॉलिवूडमधल्या आणखी एका जोडीने घटस्फोट दिल्याचं जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला. ही जोडी म्हणजे लेखिका कनिका ढिल्लोन आणि दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडी. या दोन्ही घटनांनंतर कनिका आणि दिया मिर्झाचा पती साहिल संघा यांचे एकमेकांशी अफेअर असल्याने घटस्फोट झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. या सर्व चर्चांवर आता दिया मिर्झाने मौन सोडले आहे. कोणा तिसऱ्या व्यक्तीमुळे आमचा घटस्फोट झाला नाही असा खुलासा दियाने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. त्याचसोबत बेजबाबदारपणे अफेअरचे वृत्त देणाऱ्या प्रसारमाध्यमांनाही तिने खडेबोल सुनावले आहेत.

”साहिलपासून विभक्त झाल्यावरून ज्या काही चर्चा रंगत आहेत त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आणि त्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मी हे ट्विट करत आहे. ही तर बेजबाबदारपणाची हद्दच आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे माझ्या सहकाऱ्यांची नावं यात ओढली जात आहेत. एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीचं नाव अशाप्रकारे खोट्या वृत्तासाठी बेजबाबदारपणे वापरण्याचा मी तीव्र विरोध करते. साहिल आणि मी कोणा तिसऱ्या व्यक्तीमुळे विभक्त झालेलो नाहीत. आम्हाला थोडा वेळ द्या अशी विनंतीदेखील मी प्रसारमाध्यमांना केली होती,” असे दियाने ट्विटरवर लिहिले.