कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्याने मरावं असं कोणी बोलतं का?

0
315

पुणे, दि. १५ (पीसीबी) – केतकी चितळे प्रकरणावर आता खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, की कायदा योग्य काम करेल. त्यावर मी काय बोलणार? एक तरी मी तिला ओळखतही नाही. मात्र कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्याने मरावं असं कोणी बोलतं का? कुठल्या संस्कृतीत हे बसतं?” असे बोलून त्यांनी आपले केतकी बद्दलचे मत व्यक्त केले.

नाशिकच्या दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. त्यांनी या प्रकाराविरोधात भूमिका घेतली त्यातून मराठी संस्कृतीचे चित्र दिसते असे मत व्यक्त केले. तसेच आपण सगळ्यांनी मिळून यामध्ये सातत्य ठेवले. कधीही दुसऱ्या कोणावर जर वेळ आली तर मी स्वत: त्या कृतीच्या विरोधात उभा राहीन असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यासोबत नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसल्याचे वक्तव्य केले, याबद्दल विचारले असता तुमचे लग्न झाले आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एकत्र संसार करायचे म्हंटल्यावर भांड्याला भांडे लागते असे त्यांनी मत व्यक्त केले.

केतकी चितळे हिला अटक झाली असून, आज न्यायालयाने तिला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.