काँग्रेसच्या घोडचुका सुधारण्याचे काम माझ्या नशिबी – पंतप्रधान मोदी

0
558

जयपूर, दि. ४ (पीसीबी) – ‘सत्तेचा मोह आपण समजू शकतो, मात्र, सत्तेसाठी काँग्रेसने केलेल्या चुकांची शिक्षा आजपर्यंत  देशाला भोगायला लागत आहे. काँग्रेसची प्रत्येक घोडचूक सुधारण्याचे काम माझ्या नशिबी आली आहे. तर माझे नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी म्हटले आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची  हनुमानगडमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी करतारपूर गुरुद्वारावरून काँग्रेसवर हल्ला चढवला.  फाळणीवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी समजूतदारपणा, संवेदनशीलता आणि गांभीर्य दाखवले असते, तर करतारपूर भारतापासून वेगळे होऊन पाकिस्तानात गेले नसते, असा आरोप मोदींनी  काँग्रेसवर केला.

दरम्यान, पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री  नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर करतारपूर कॉरिडोरचा मुद्दा  ऐरणीवर आला आहे. काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.  सिद्धूवर भाजपने हल्ला केल्यानंतर सिद्धूंनीही थेट मोदींवर  तोफ डागली होती. यावर मोदींनी राजस्थानमध्ये उत्तर दिले आहे.