“औद्योगिक पट्ट्यातही कडक लॉकडाऊन करा”- प्रकाश मुगडे

0
262

पिंपरी,दि. 26 (पीसीबी) – कोरोना कोविड -19 वर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी दि. 14 एप्रिल पासून संपुर्ण महाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहिर केले. अत्यावश्यक सेवेबरोबर सार्वजनिक वाहतूक, औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरु ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक कारखान्यांसह पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील सर्व मोठे कारखाने शंभर टक्के बंद केले तरच काही अंशी कोरोनावर मात करता येईल. अन्यथा 14 एप्रिल पासूनचा लॉकडाऊन पुर्णपणे फसला असून पुन्हा 1 मे नंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाईल. यामुळे आणखीनच चिंताजनक परिस्थिती उद्‌भवेल याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी भाजपा कामगार आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, कोरोना कोविड -19 च्या दुस-या लाटेने संपुर्ण महाराष्ट्रात गंभिर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड मधिल सर्व शासकीय आणि मनपाची रुग्णालये, कोविड केंद्र पुर्ण क्षमतेने भरलेली आहेत. ‘ब्रेक द चेन’ च्या काळात देखिल रुग्ण संख्या आणि मृत्यूंचा आकडा कमी झालेला दिसत नाही. तर पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी 94 रुग्णांचा मृत्यू झाला तर 2265 नागरीकांना कोरोनाची बाधा झाली. ‘ब्रेक द चेन’ कालावधीत औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना उत्पादन सुरु ठेवण्यास परवानगी दिल्यामुळे कामगारांमध्ये आणि त्यांच्या कुटूंबियांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे दिसत आहे.

भाजपा कामगार आघाडीच्या प्रतिनिधी मंडळाने पुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यांमधिल विविध कारखान्यांना मागील आठवड्यात भेट देऊन कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी निदर्शनास आले की, सर्व शासकीय कार्यालयात शासनाच्या नियमांनुसार फक्त पंधरा टक्के कर्मचारी उपस्थित राहत आहेत. परंतू सर्व औद्योगिक कारखान्यात शंभर टक्के उपस्थिती आहे. अनेक कारखान्यात आजही सर्व कर्मचा-यांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. तर काही मोठ्या कारखान्यांत हजारांहून जास्त कर्मचारी आहेत. यांना येण्याजाण्यासाठी काही कंपन्यांकडून वाहन व्यवस्था आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था, कॅन्टीन सुरु आहे. या कारखान्यांवर अवलंबून असणारे लघु उद्योजक, सुक्ष्म उद्योजक, व्यापारी, ठेकेदार, पुरवठादार यांचे देखिल काम सुरु आहे. सर्वच कारखान्यातील कामगार रोज घरी जातात पुन्हा कामावर येतात. यात सामाजिक अंतर आणि इतर नियमांचे काटेकोरपणे पालन होत नाही. त्यामुळेच कोरोनाच्या वाढत जाणा-या रुग्णांमध्ये कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या बाधित कर्मचा-यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना रुग्णालयात बेड मिळत नाहीत. त्यामुळे अनेक बाधित कर्मचारी होम क्वॉरंटाईनचा पर्याय निवडतात. त्यामुळे आणखीनच रुग्णांची संख्या वाढत आहे. ‘ब्रेक द चेन’ कालावधीत बहुतांशी मोठ्या शहरांमधिल बाधितांच्या संख्येत वाढच झाल्याचे दिसत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 23 मार्च 2020 ला ज्याप्रमाणे पुर्ण लॉकडाऊन करण्यात आला होता. त्याप्रमाणे आताही पुर्ण लॉकडाऊन करावे आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अन्यथा कोरोनावर नियंत्रण मिळवणे अशक्य होईल. त्याचे विपरीत परिणाम कामगार क्षेत्रावरच जास्त होण्याची भिती या पत्रात भाजपा कामगार आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी व्यक्त केली आहे.