औरंगाबाद, दि. २६ (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना भाजपकडून राजकीय विजनवासात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, राज्यात लेवा पाटीदार समाजाचे मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे खडसे यांना मंत्रिपद देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अन्यथा येत्या काळात भाजपला दणका दिला जाईल, असा इशारा लेवा पाटीदार समाजाचे नेते रमेश पाटील यांनी दिला आहे.
औरंगाबाद सिडको मध्ये लेवा पाटीदार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा परिचय कार्यक्रम झाला. यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी पाटील म्हणाले की, राज्यात लेवा पाटीदार समाजाची संख्या ३० ते ३५ लाखांवर असून तीन आमदार व एक खासदार आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यानच्या काळात खडसे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून न्यायालयाने दिलासा दिला आहे. तरीही त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खडसे कोणती भूमिका घेणार हे येणार काळच ठरवेल. पण भाजपने खडसेंना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, असे पाटील म्हणाले.