इयत्ता पहिली, दुसरीच्या मुलांना गृहपाठ देऊ नका; मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा आदेश

0
879

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – इयत्ता पहिली आणि दुसरीतील मुलांच्या तणावमुक्त आणि आनंददायी शिक्षणासाठी  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एका मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिली, दुसरीच्या मुलांना शिक्षकांनी गृहपाठ देऊ नये, असे आदेश दिले आहेत.  याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्यावतीने राज्यांना परिपत्रक पाठवले आहे. तसेच १० वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबतही सुचना दिल्या आहेत. यामुळे मुलांची तणावपूर्वक अभ्यासातून सुटका होणार आहे. 

शालेय विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय दप्तराचे वजन जास्तीत जास्त दीड किलोपर्यंत असेल याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि भाषा हे दोनच विषय शिकवावेत. तर तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणित, भाषा आणि सामान्य विज्ञान शिकवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यकता नसलेल्या पुस्तकांना शाळेत न आणण्याच्या  सुचना विद्यार्थ्यांना द्याव्यात, असे या परिपत्रकात  म्हटले आहे.

तर, तिसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन दोन ते तीन किलो, सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन चार किलो, आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन साडेचार किलो आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन पाच किलोपेक्षा अधिक असू  नये, अशा सक्त  सूचना या परिपत्रकात  दिल्या आहेत.