आषाढी वारी, पालखीबाबत काय होणार

0
247

पुणे, दि. १६ (पीसीबी) : कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत आषाढी वारी बाबत बैठक पार पडली. तेव्हा वारकरी विश्वस्थांनी अजित पवारांसमोर तीन पर्याय ठेवले होते. मात्र, अजित पवारांनी चौथा पर्याय निवडत 30 मेनंतर यावर निर्णय देण्यात येईल, असं सांगितलं. राज्य मंत्रीमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केली जाणार असून त्यांनतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता त्यांची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलं.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन आणि विश्वासात घेवूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरुप कसे असावे, याबाबत आळंदी आणि देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरुप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पायी वारी आणि पालखी सोहळ्याच्या स्वरुपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सोलापूर, सातारा आणि पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत.

या बैठकीत वारकरी विश्वस्थांनी अजित पवारांसमोर वारी करण्यासाठी तीन पर्याय ठेवले होते. ३०० वारकरी घेऊन वारी करण्याची परवानगी द्यावी, २०० मानाचे दिंडीप्रमुख आणि विणेकरी यांना घेऊन वारी करण्याची परवानगी मिळावी आणि वाहनात पालखी घालून ४० वारकरी पंढरपुरला जातील, असे तीन पर्याय ठेवण्यात आले. दरम्यान, स्वतः अजित पवार यांनी आणखी नवीन तोडगा काढण्यासाठी `थोडे थांबा` म्हटले आहे.