आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही; राऊतांचा चंद्रकांतदादांवर पलटवार

0
255

शिरुर, दि. ४ (पीसीबी) : शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्हाला बाळासाहेबांनी हे घाणेरडं काम कधीच शिकवलं नाही, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चंद्रकांतदादांवर चढवला.

संजय राऊत आज शिरुरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्ही शिवाजी महाराजांची औलाद आहोत. अफजल खानाचा कोथळा पुढून काढलेला आहे. जो कोणी असेल तो. शाहिस्ते खानाची बोटं समोरून तोडली आहेत. पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे घाणेरडं काम कधी शिकवलं नाही. काय असेल ते समोरून. पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा शिवसेनेची नाही, असं सांगतानाच पाठीत खंजीर आमच्या खुपसलेला आहे. शब्द आम्ही नाही फिरवला नाही. शब्द तुम्ही फिरवला आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
चंद्रकांत पाटील यांना मी चंपा म्हणणं बरोबर नाही. ते म्हणाले 105 आमदार आहेत तरी आमचा मुख्यमंत्री नाही. 105 वाले चोळत बसलात. त्यांना वाटलं ते येतील, पण आले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.आता राज्यात ठाकरे सरकार आहे. अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. घरवापसी म्हणता तुम्ही त्याला. रागानं घरं सोडायचं नसतं. शिवसेना हे मंदिर आहे. मधल्या काळात जे शिवसेनेच नुकसान झालं ते न भरून येणारं आहे. शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीतला भगवा खाली उतरला. घरात भांडण हे होत असतात. आपण टोकाचे निर्णय घेतो. जो शिवसेनेतून दूसऱ्या घरात जातात ते सुखी नसतात. अनेक बोचकी शिवसेनेतून गेली. जे गेले त्यांना आता परत घ्यायचं नाही, असं त्यांनी सांगितलं.