अहमदनगर, दि. २ (पीसीबी) – आपल्या जीवाला बरं वाईट झाल्यास जनता पंतप्रधान मोदींनाच जबाबदार धरेल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. राळेगणसिद्धीमध्ये गेल्या ४ दिवसांपासून अण्णा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
१ जानेवारीला अण्णांनी मोदींना पाठवलेले पत्र मिळाले असल्याचे पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून अण्णांना पाठवण्यात आले आहे. मात्र, या पत्रात अण्णांच्या मागण्यांच्या पूर्ततेविषयी कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही, असे अण्णांनी यावेळी सांगितले.लोकपाल, लोकायुक्तची अंमलबजावणी व्हावी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी अण्णांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
दरम्यान अण्णा हजारे यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस असल्याने राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन केले आहे. पारनेर-वाडेगव्हान राज्य मार्गावर राळेगणसिद्धी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत.