आता भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा – रामदास आठवले

0
493

मुंबई, दि. २६ (पीसीबी) –  भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून जैश मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मोठा तळ उद्‌ध्वस्त  केला. आता पाकव्याप्त काश्मीर मध्ये असलेले सर्व दहशतवादी संघटनांचे तळ उद्‌ध्वस्त करून भारताने पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घ्यावा, असे  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  आज (मंगळवार ) म्हटले आहे.

पाकिस्तानवर  केलेल्या कारवाईबद्दल भारतीय  हवाई दलाच्या जवानांचे रामदास आठवले यांनी अभिनंदन केले.  भारतीय हवाई दलातील जवानांनी  अतुलनीय शौर्य केले आहे. आपल्या जवानांचा आम्हाला अभिमान  आहे, असे  त्यांनी म्हटले आहे.

काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर  पाकिस्तानशी आरपारची लढाई  करावी.  सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तनाला धडा शिकविण्याची जनभावना व्यक्त झाली होती.  ती पूर्ण  झाल्याबद्दल आठवले यांनी समाधान व्यक्त केले आहे. मोदी सरकारने पाकिस्तानवर केलेला दुसरा सर्जिकल स्ट्राईक अभिनंदनीय आहे. पाकला कायमचा धडा शिकविण्यासाठी संपूर्ण  देश  एकजुटीने सरकार आणि सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,  असे आठवले यांनी म्हटले आहे.