नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – पाकिस्तानने भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी सुखरूप सुटका केली. यावेळी अभिनंदन यांना सुरक्षितपणे वाघा बॉर्डरपर्यंत आणण्यासाठी एका महिलेने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. ही महिला म्हणजे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयात भारताच्या संचालक असणाऱ्या डॉ. फरिहा बुगती.
डॉ. फरिहा यांनी अभिनंदन यांच्या अटकेपासून सुटकेपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये संवाद, समन्वय साधण्याची मोलाची कामगिरी पार पाडली आहे. त्याचबरोबर फरिहा बुगती यांच्यावर कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचीही जबाबदारी आहेत.
दरम्यान, शुक्रवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी अभिनंदन भारतात दाखल झाले. यावेळी भारतीय वायुदलाने त्यांना ताब्यात घेतले. अभिनंदन यांना लगेच हवाई दलाच्या विशेष विमानाने दिल्लीला रवाना करण्यात आले. देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असणाऱ्या पालम विमानतळावर ते रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले.