नाशिक : दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. काल (दि. 16) मनमाड येथील सभा आटोपून शरद पवार आणि जयंत पाटील हे नाशिकच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी दाखल झाले. शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट दिल्याचा दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, खुद्द जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना हे वृत्त फेटाळले आहे.
अजित पवार नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबतही अनिल देशमुख यांनी मोठं वक्तव्य केले आहे. चार जूननंतर महायुतीतील अनेक नेते नाराज असतील. मात्र जे पक्षाला सोडून गेले त्यांना परत घ्यायचं नाही हे पवार साहेबांनी सांगितलं आहे, असे त्यांनी म्हटले.
शरद पवार ज्या हॉटेलला मुक्कामी होते. ते हॉटेलला सुनील तटकरे येऊन गेले, असे मला कळले. माझी भेट झाली नाही. मात्र आमचे काही कार्यकर्ते त्यांना भेटले, असा दावा देखील त्यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोणीही संपर्कात आला तरी आम्ही कोणालाही परत घेणार नाही, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे












































