जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरात शिरले पाणी; अनेक भागात समस्या नित्याचीच

0
766

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – शहराच्या विविध भागात मंगळवारी (दि. २४) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. काही भागात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने रात्री दोन पासूनच मदत कार्य सुरू केले असून अजूनही काही भागात पावसाचे व ड्रेनेजचे पाणी साचून आहे. 

भोसरीतील आदीनाथ नगर, देवराई बिल्डींग, जाधववाडी, चऱ्होलीतील लक्ष्मीनगर, काळेवाडीतील आझाद कॉलनी तीन आदी परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. रात्री दहा ते अकराच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तसेच ड्रेनेजचेही तुंबल्याने पाण्याची पातळी वाढली. परिणामी स्वच्छतागृहाच्या माध्यमातून नागरिकांच्या घरात पाणी घुसले. अदिनाथ नगर परिसरात नाल्याची भिंत कोसळून पाण्याचा प्रवाहच लोकवस्तीत वळला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याबाबत महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय घुगे म्हणाले, परिसरात मदत कार्य सुरू असून कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. कोणत्या ठिकाणी नाल्याची, भिंतीची व पाईपची गरज आहे, याची माहिती घेऊन त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार आहेत.

काळेवाडीला कोण वाली आहे का?

काळेवाडीतील आझाद कॉलनी तीनमध्ये पावसाचे पाणी जाण्यासाठी जागा नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून नागरिकांच्या घरात पाणी शिरते. ही समस्या गेली १० वर्षांपासून आहे. मंगळवारी रात्री येथील अनेक नागरिकांच्या घरात शिरले. याबाबत नागरिकांनी सारथी हेल्पलाईनला फोन केला, असता स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधण्यास सांगितले. परंतू, नगरसेवकांनी फोन उचलला नाही. त्यामुळे नागरिक हवालदील झाले व रात्र जागून काढली. एक स्थानिक गाववाला पावसाचे पाणी वाहून नेणारी वाहीनी टाकण्यास जागा देत नसल्याचे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देऊनही दखल घेतली जात नाही. असे नागरिकांनी सांगितले.