मुंबई,दि.२२(पीसीबी) – शेतकरी महेंद्र देशमुख हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले असताना त्यांना धक्काबुक्की झाली होती. त्यांनीच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. शेतकऱ्यांना फक्त भाजप न्याय देऊ शकतो, अशा भावना महेंद्र देशमुख यांनी व्यक्त केल्याचं कळतंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी शेतकरी महेंद्र देशमुख मातोश्रीबाहेर आले असताना त्यांच्यावर अन्याय झाला होता. हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सांगितलं होतं.कृषीमंत्री, तहसीलदार, बँक अधिकारी यांच्याशी खूप दिवस चर्चा करूनही ही विषय मार्गी न लागल्याने महेंद्र देशमुख यांनी त्यांच्या लहान मुलीसह फडणवीसांची भेट घेतली आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेतेच मला न्याय देऊ शकतील. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना फक्त भाजपच न्याय देऊ शकतं, असं देशमुख यांनी म्हटल्याचं भाजप आमदार राम कदम यांनी सांगितलं आहे.