…म्हणूनच राष्ट्रवादीनं मुद्दाम हे मंत्रिपद धनंजय मुंडे यांना दिलं आहे – शरद पवार

0
847

मुंबई,दि.२२(पीसीबी) – ‘ कमकुवत मंत्र्यांकडे सामाजिक न्याय खातं देण्याची प्रथा राज्यात आतापर्यंत चालत आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडे हे खातं दिल्यानंतर सर्वांनी आश्चर्य वाटलं असेल. पण, या खात्यामार्फत सर्वसामान्य आणि गरिब जनतेची कामं तात्काळ होणं शक्य आहे. म्हणूनच राष्ट्रवादीनं मुद्दाम हे खातं धनंजय मुंडे यांना दिलं आहे. मुंडे यांची ग्रामीण जनतेशी नाळ जोडली आहे. त्यांच्या अडचणी मुंडे यांना माहित आहे. ते चांगल्याप्रकारे त्यांच्या समस्या सोडवू शकतात.’ असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.

शरद पवार यांनी मंगळवारी इंदू मील येथील बहुचर्चित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांना सामाजिक न्यायमंत्रिपद देण्यामागचे कारण सांगताना ते बोलत होते.

मागील पाच वर्षांत धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत विरोधीपक्ष नेता पदाची जबाबदारी यशस्वी पार पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर मुंडे यांना महत्वाच्या खात्याची जबाबदारी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, प्रत्यक्षात खातेवाटपानंतर धनंजय मुंडे यांना सामाजिक न्यायमंत्रिपद देण्यात आलं. धंनजय मुंडे यांना सामाजिक सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वांना धक्का बसला होता. आता या संदर्भात खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खुलासा केला आहे.