सावरकरांना ‘भारतरत्न’ म्हणजे भगतसिंगांच्या हौतात्म्याचा अपमान- कन्हैया कुमार

0
394

अहमदनगर, दि. १७ (पीसीबी) – ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देणे म्हणजे भगतसिंग यांच्या बलिदानाचा अपमान ठरेल,’ असं मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता कन्हैया कुमार याने व्यक्त केले आहे.

नगरमधील भाकपचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचारासाठी आला असता तो बोलत होता. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने नुकतेच संकल्पपत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द दिला आहे. त्यावरून कन्हैया कुमारने भाजपवर निशाणा साधला. ‘महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत, पण राज्यातील प्रश्नावर कोणी बोलत नाही. प्रत्येक प्रश्नावर फक्त ३७० व रामबाण (राममंदिर) हेच मुद्दे का आणले जात आहेत, असा प्रतिप्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला. ‘भाजपकडून सातत्याने मोदींचा पर्याय काय असाच प्रश्न विचारला जातो. दुसरीकडे काँग्रेस व अन्य पर्याय असलेले नेते ‘ईडी’च्या भीतीने एका रात्रीत गांधीजींचे गुणगान सोडून नथुराम गोडसेची स्तुती करीत आहेत. त्यामुळे जनतेतून आता सर्वसामान्य पर्याय उभा राहिला पाहिजे. नोकऱ्या जात आहेत. शेतकरी आत्महत्या होत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच आहेत, महाराष्ट्रात मागच्या निवडणुकीत भाजप ने दिलेल्या आशासनांपैकी किती पूर्ण झाली. किती आश्वासने पुन्हा देण्यात आली आहेत, हे कोणीच विचारत नाही. भाजपही त्यावर काही बोलत नाही,’ असे कन्हैया म्हणाला.

‘देशात विरोधकांचा एकच पर्याय उभा राहत नाही, हे दुर्दैव आहे. ईडी व अन्य लोकशाही यंत्रणांचा गैरवापर होत आहे. बिहारमध्ये २०१५ साली जनतेने भाजपच्या विरोधात मतदान केले, पण भाजपने तेथील मुख्यमंत्रीच पळवला. धर्माच्या नावाखाली मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशा स्थितीत राज्यघटना व तिने जनतेला दिलेले अधिकार वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत’, असे कन्हैया म्हणाला. शाहीर संभाजी भगत हेही यावेळी उपस्थित होते.