औरंगाबाद, दि. २० (पीसीबी) – शिवसेनेला असा एक पंतप्रधान हवा होता की, जो पाकिस्तानवर हल्ला करेल. पाकवर हल्ला करण्याची हिंमत पंतप्रधान मोदी यांच्याकडे आहे, म्हणूनच शिवसेनेने भाजपसोबत युती केली, असा खुलासा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.
उध्दव ठाकरे औरंगाबाद येथे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी युती करण्यामागील कारणे सांगितली. तसेच एमआयएम’वरही कडाडून हल्ला चढवला.
शिवसेनेने भाजपसोबत पुन्हा एकदा नव्याने युती केली, कारण आपल्या पक्षाला एक असा पंतप्रधान हवा होता की, ज्याच्याकडे पाकिस्तानवर हल्ला करण्याची हिंमत असेल, असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ‘पाकिस्तानात घुसून हल्ला करणारा पंतप्रधान आम्हाला हवा आहे. त्यामुळेच आम्ही पुन्हा एकदा युती केली आहे. मी मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी भाजपासोबत हातमिळवणी केली आहे’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.