नागपूर, दि. २४ (पीसीबी) – आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे, असा विश्वास व्यक्त करून दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपद दोन-दोन वर्षे वाटून घ्यावे. तसेच एक वर्ष मुख्यमंत्रीपद रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावे, अशी मागणी आरपीआयचे प्रमुख व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
नागपुरात रामदास आठवले पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व सेनेने एकत्र लढणे दोघांच्या हिताचे आहे. मुख्यमंत्रिपदाबद्दल वाद असून त्यावर मार्ग काढण्यासाठी अडीच-अडीच वर्षांसाठी दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपद घ्यावे. तर दोन्ही पक्षांनी सहा महिने मुख्यमंत्रीपद रिपब्लिकन पक्षाला द्यावे, असा आपण फॉर्म्युला तयार केला असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले.
या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांतील नेत्यांशी चर्चा केलेली नाही. परंतु युती भक्कम करण्यासाठी हा फॉर्म्युला तयार केला असल्याचे आठवले यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर काही तोडगा निघताना दिसत नाही. दोन्ही पक्षांमध्ये कुणाला मंत्रिपद द्यावे, याबद्दल एकमत होत नाही. त्यामुळे ही मंत्रिपदे रिपब्लिकन पक्षाला दिल्यास वादाचा प्रश्नच येणार नाही, असेही ते म्हणाले.