प्लाझ्मा स्पीकर आणि लेजर लाईट वर १००% बंदी तर डीजे चा आवाज मान्य डेसिबल पेक्षा जास्त असू नये – संदीप खर्डेकर.

bpcauthor
3 Min Read

लोकानुनय करताना वृद्ध, रुग्ण, लहान मुलांचा विचार करावा 🙏

सर्वधर्मीय सण,उत्सव, महापुरुषांच्या जयंती मिरवणूकांना नियमन आवश्यकच – संदीप खर्डेकर यांची मागणी.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कर्णकर्कश साउंड वर बंदीच्या घोषणेचे स्वागत.

मी अविवेकाची काजळी।
फेडूनी विवेक दीप उजळीं।
तैं योगियां पाहे दिवाळी। निरंतर॥
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या अभंगात म्हंटल्याप्रमाणे आता सण उत्सवात विवेकाची कास धरण्याची वेळ आली आहे.
श्री गणेश आगमन, विसर्जन च्या मिरवणूका असो,ईद च्या मिरवणूका असो वा महापुरुषांच्या जयंतीच्या मिरवणूका…. कर्णकर्कश आवाजातील डीजे समोर विभत्स अंगविक्षेप करत नृत्य करणे हा आता अविभाज्य भाग झालाय.
अश्या सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या, कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात थिरकणे म्हणजे निर्बंधमुक्त सण साजरा करणे हे कोणत्या धर्माची शिकवण आहे हेच समजत नाही. समाजातील एका वर्गाला हे आवडत असले तरी समाज खूप मोठा आहे… समाजातील असंघटित सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून जर विचार केला तर बहुतांश नागरिकांना हे प्रकार आवडत नाहीत मात्र ते व्यक्त होताना विरोध करताना ही घाबरतात ही शोकांतिका आहे.
सर्वपक्षीय नेत्यांनी व प्रशासनाने देखील लोकानुनयाची भूमिका घेताना याचे भान ठेवणे गरजेचे आहे की वृद्ध, लहान मुलं, रुग्ण यांच्यावर ह्या सर्वांचा काय परिणाम होतं असेल ? ते याच समाजातील घटक असून त्यांचा आपण विचार करणार आहोत कां नाही ?
जर तरुणाई वाहवत जात असेल तर त्यांना योग्य मार्ग दाखविण्याची जबाबदारी नेत्यांचीच आहे असे माझं स्पष्ट मत आहे. लोकशाहीत बहुमताला महत्व असले तरीही गर्दीची मानसिकता ही नेहमी योग्य असते असे नाही.
मा. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कर्णकर्कश साउंड वर बंदी चा निर्णय जाहीर केलाय त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र ही बंदी सर्वधर्मीय सण, महापुरुषांच्या जयंती मिरवणूका यासाठी समान न्यायाची असावी आणि या भूमिकेवर आयुक्तांनी ठाम रहावे.अर्थात दहीहंडी हा ट्रेलर असून तेव्हाच याची प्रचिती येईलच की गणेशोत्सव कसा असेल.
मी ही कट्टर हिंदुत्ववादी असून अनेक गणेश मंडळाशी संबंधित आहे, मी कोथरूड नवरात्र महोत्सवाचा ही अध्यक्ष असून किमान हिंदू सणातील गैरप्रकार दूर व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहे. गणेशोत्सव दणक्यात साजरा झालाच पाहिजे पण त्यातील गैरप्रकार देखील टाळलेच पाहिजेत याबाबत माझी आग्रही भूमिका आहे. नुकत्याच झालेल्या नागपंचमी सणाच्या मिरवणूकांच्या रील्स बघितल्या की येणारा काळ कसा असेल याची काळजी वाटते. तरी आता समाजातील विवेक शाबूत असणाऱ्यांनी एकत्र येऊन अश्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करत आहे.

संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995

Share This Article