“महापुरुषांच्या पुण्याईची बेरीज करा-डॉ. श्रीपाल सबनीस”

0
3

दि. १७(पीसीबी)-” छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा तमाम महापुरुषांनी समाजातल्या सर्व घटकांच्या उद्धाराचे कार्य केले. महापुरुषांना जाती पातीच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. त्यांच्यातील सामान्यत्वाला बाजूला काढून असमान्यत्वाचा वेध घेतला पाहिजे. अराजकाच्या पार्श्वभूमीवर जगात शांतता, सात्विकता जोपासत विश्वसंस्कृती, विश्वबंधुत्व, विश्वमानवता वाढली पाहिजे. महापुरुषांच्या जीवनाचा सार आपल्यामध्ये बिंबवत त्यांच्या पुण्याईची बेरीज झाली पाहिजे.” असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे.चिखली येथील कॉनक्वेस्ट महाविद्यालयामध्ये ज्ञानसमृद्धी व्याख्यानमालेचे प्रथम सत्र गुंफताना ” शिव -फुले- शाहू -आंबेडकर: एक सामाजिक विचार” या विषयावर डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते.

व्याख्यानमालेचे उद्घाटन मा. नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पिं. चिं. व्याख्यानमाला समन्वय समितीचे कार्यवाह राजेंद्र घावटे, मा. नगरसेवक मारुती भापकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध जलतज्ञ व महाराष्ट्र विकास केंद्र संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील हे होते.

डॉ. सबनीस पुढे म्हणाले की,
” आज केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नाही तर वैचारिक निरक्षरता व प्रदूषण यावर मात करणारे शिक्षण दिले पाहिजे. इतिहासाशी गद्दारी करत मोडतोड करणारे तथाकथित विद्वान खूप झाले आहेत. विवेकवादी विचारवंतांचे विचार आपण वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. शिवाजी महाराजांचा हिंदू धर्म हा सर्वांना सामावून घेणारा सहिष्णू होता, महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्माचा अंगीकार केला. शाहू महाराजांनी धर्मचिकित्सा करत वेदप्रामाण्य वाद स्वीकारला. बाबासाहेबांनी दैववादी धर्म नाकारला. परंतु या सर्वांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकूण समाजिक विचार रुजवला. दुःखमुक्त आणि ज्ञानसमृद्ध समाज निर्माण करण्यासाठी महापुरुषांच्या विचार समजावून घेतले पाहिजेत.” असे ते म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतात अनिल पाटील म्हणाले की, “महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भविष्यातील धोके लक्षात घेऊन पर्यावरणावर लक्ष दिले पाहिजे आणि पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक राहिले पाहिजे.”

यावेळी राजाभाऊ गोलांडे, राजेंद्र घावटे, मारुती भापकर यांचीही मनोगते झाली.

प्रास्ताविक, प्रसिद्ध व्याख्याते व प्राचार्य प्रदीप कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सिद्धार्थ डोंगरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. गणेशराज कसबे यांनी केले. व्याख्यानामालेसाठी प्रा. वैभव पताळे, डॉ.अमोल कवडे, प्रा. आण्णासो लावंड, प्रा. संदीप सोनवणे, प्रा. लखन भोसले, प्रा. कोमल वाघ, प्रा. सपना बिराजदार, प्रा. स्मिता देशमुख आदींनी विशेष परिश्रम घेतले. व्याख्यानाला विद्यार्थी, प्राध्यापक व पालक यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.