अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक

3 Min Read

मुंबई, दि. २८ : राज्याते माजी उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दुर्घटनेला आज दोन महिने पूर्ण झाले. २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अजित पवारांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. या घटनेला आज २ महिन्यांचा कालावधी उलटला असून आजही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना, नेत्यांना दादांची उणीव प्रकर्षणाने जाणवते. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातही या अपघाती निधनाने अतिव वेदना आहेत. दुसरीकडे या अपघाताच्या तपासासाठी आमदार रोहित पवार सातत्याने पाठपुरावा करत आहेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेतून हा अपघात जर घातपात असेल तर कोणालीही सोडणार नाही, असा इशाराच दिलाय. दरम्यान, आज अजित पवारांच्या निधनाला दोन महिने झाल्यांतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावुक होत आठवणी जागवल्या आहेत.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. आज अजित पवारांच्या जागी कार्यरत असताना तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. ”दादा, आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते. तुमच्यातील लोकाभिमुख – विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली.”, अशा शब्दात सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त केल्या.

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवरच वाटचाल
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल तुमच्या प्रेरणेनेच अखंड सुरू आहे. लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केले असते, हा विचार मनात ठेवून मी प्रत्येक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते. तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते. पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे विचार आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आठवण मनात कायमची कोरलेली आहे. तुमच्या शब्दांमधील ताकद मला उभे राहण्याची ऊर्जा देते. दादा, तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य आहे. पण तुमची स्वप्ने, तुमचे कार्य आणि तुमचे विचार पुढे नेण्याचा निर्धार मी कायम मनाशी जपेन. तुम्ही दाखवलेली दिशा आणि दिलेली मूल्ये हीच आमची प्रेरणा आणि मार्गदर्शक राहतील., असेही त्यांनी म्हटले.

Share This Article