तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आता महाराष्ट्राच्या राज्यपाल

0
3

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी रात्री अनेक राज्यांच्या राज्यपाल बदलीचे आदेश दिले. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांना तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी काल सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रात्री उशीरा अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत.

कोण आहेत जिष्णू देव वर्मा?

त्रिपुराच्या राजघराण्यात जन्मलेले जिष्णू देव वर्मा हे ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात. २०१८ ते २०२३ या काळात त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले होते. तसेच वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकास सारख्या महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी सांभाळली होती.

१५ ऑगस्ट १९५७ रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे त्यांचा जन्म झाला. १९९० च्या दशकात त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. डाव्यांचे वर्चस्व असलेल्या त्रिपुरात वर्मा यांनी भाजपाची संघटना उभी करण्याचे काम केले. १९९६, १९९८ आणि १९९९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्रिपुरा पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली.