भाजपने केलेले 70 हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली

0
3

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अजित पवार यांना शेवटचा निरोप द्यायला राज्यभरातून हजारोंचा जनसमुदाय बारामतीत जमला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, नितीन गडकरी, रामदास आठवले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह राज्य आणि देशातील बडे नेते अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे उपस्थित होते. पार्थ पवार आणि जय पवार या दोन्ही मुलांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यानंतर काहीवेळातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपला लक्ष्य केले आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर आज भाजपने राज्यातील प्रमुख दैनिकांमध्ये अजितदादांनी श्रद्धांजली वाहणाऱ्या या जाहिराती दिल्या आहेत. हाच धागा पकडत संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले. ‘भाजपने कमाल केली! दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणार? अजित दादांवर भाजपा म्हणजेच पं.मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेले 70 हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल’, असे संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. संजय राऊत यांच्या या टीकेनंतर आता भाजप काय प्रत्युत्तर देणार, हे बघावे लागेल.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी अजित पवार बारामतीत येणार होते. त्यासाठी सकाळी 8.10 वाजता त्यांच्या विमानाने मुंबईतून उड्डाण केले. 8.43 वाजता अजित पवार यांचे विमान बारामती येथे उतरणार होते. मात्र, धावपट्टीवर उतरण्याऐवजी अजित पवारांचे हे विमान बाजूच्या शेतात कोसळले आणि प्रचंड मोठा स्फोट झाला. यानंतर अग्निशमन दल आणि आपातकालीन सेवा तातडीने याठिकाणी पोहोचल्या. त्यांनी विमानाला आग विझवली. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला.