आजचा दिवस मोठी दुःखद बातमी घेऊन आला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान सकाळी ९ वाजेदरम्यान बारामती विमानतळाजवळ उतरण्याच्या तयारीत असताना शेजारच्या शेतात कोसळले. या भीषण विमान अपघातात काळाने महाराष्ट्राचा एक करारी, कामाचा मोठा झपाटा असलेला, रोखठोक भूमिका घेणारा नेता हिरवला. अजितदादांच्या विमानाचा मोठा स्फोट झाला. या मृत्यूने महाराष्ट्राला, पवार कुटुंबियांना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला.
आज दिवसभरात त्यांच्या चार सभा होत्या. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांची धावपळ सुरू होती. महानगरपालिका निवडणुकीतही त्यांनी मोठी धावपळ केली होती.उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी सुमारे ७ वाजता आपल्या सुरक्षा पथकासह आणि कर्मचाऱ्यांसोबत ८ आसनी चार्टर्ड विमानाने मुंबईहून रवाना झाले होते. हे विमान बारामतीकडे येत होते. या विमानात अजितदादा, त्यांचे दोन सहाय्यक, दोन पायलट आणि इतर दोघे होते. हे विमान कोसळल्यानंतर एकामागून एक स्फोट ऐकू आले. अजितदादा हे कामासाठी वाघ माणूस मानल्या जायचे. भल्या पहाटे उठून ते कामाला सुरुवात करायचे. सकाळीच एखाद्या बसस्थानकाला, उद्यानाला अथवा सार्वजनिक ठिकाणी भेट देऊन तिथली व्यवस्था ते पाहात आणि प्रशासनाला योग्य निर्देश देत. त्यामुळे प्रशासनात त्यांचा आदरयुक्त धाक होता. पण आज अचानक आलेल्या या वाईट बातमीने प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांना दुःख आवरता आले नाही. बारामती तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांचा दौरा नियोजित होता. त्यांच्या आजच्या कार्यक्रमात तालुक्यातील चार ठिकाणी जाहीर सभा होत्या.जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभा स्थळे व वेळा
निरवागज – सकाळी १०.०० वाजता
पांडरे – दुपारी १२.०० वाजता
करंजेपूल – दुपारी ३.०० वाजता
सुपा – सायंकाळी ५.३० वाजता
VSJ Ventures चा भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार हे विमान VSJ Ventures चे Lear Jet असून, त्यामध्ये ३ प्रवासी २ क्रू मेंबर्स (१ पायलट, १ कर्मचारी) असे विमानात होते. मात्र या कार्यक्रमांच्या सुरूवातीपूर्वीच अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर तातडीने आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विमानातील इतर प्रवाशी या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. ही बातमी आता राज्यात वाऱ्यासारखी पसरली असून त्यांच्या सहकाऱ्यांच्या तोंडून शब्दही फुटत नाहीयेत. अनेक जणांना अश्रू आणि हुंदके अनावर झाले आहेत.







































