राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 ही मतदार यादी ग्राह्य धरण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांना दिलेल्या यूजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने संबंधित प्राधिकरणांना 14 ऑक्टोबर पासून आयोगाच्या वेबसाईटवरून विधानसभेच्या मतदार याद्या डाऊनलोड करता येणार आहेत .
हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी मुदत-
विधानसभेच्या मतदार याद्यांच्या आधारे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारुप मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 6 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर हा कालावधी ठेवण्यात आला आहे.
संबंधित नागरिक, राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना या काळात आपली हरकत किंवा दुरुस्तीची सूचना नोंदवता येईल.
अंतिम मतदार यादी
प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय घेऊन 28 नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 4 डिसेंबर रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी जाहीर केली जाईल. तर 10 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण-
राज्य निवडणूक आयोगाने सांगितले की, सर्व महानगरपालिकांनी निश्चित वेळापत्रकानुसार काम पूर्ण करावे आणि मतदार यादीतील नोंदींची शुद्धता सुनिश्चित करावी. या प्रक्रियेनंतर राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे.
मतदार यादी पुडताळणी पुढे ढकला –
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात मतदार यादी पुडताळणी पुढे ढकण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कारण देत राज्यातील मतदार यादीची विशेष सुधारणा पडताळणी मोहीम (SIR) जानेवारी 2026 पर्यंत लागू करण्याची योजना पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 9 सप्टेंबर रोजी पत्र पाठवून राज्यातील निवडणूक अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात व्यस्त असतील त्यामुळे ही प्रक्रिया करण्यास विलंब लागणार असल्याचं कळवलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 च्या आपल्या आदेशाद्वारे राज्य निवडणूक आयोगाला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.