हडपसर, पिंपरीनंतर खडवासलात अजितदादांचा जनसंवाद

0
16

पुणे, दि . ११ ( पीसीबी ) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पुढाकारातून ‘जनसंवाद’ उपक्रमाचा खडकवासला टप्पा मोठ्या उत्साहात पार पडला. हडपसर आणि पिंपरीतील यशस्वी जनसंवादानंतर हा उपक्रम खडकवासल्यात राबवण्यात आला.

अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी राज्यातील मुसळधार पावसामुळे आणि पूरसदृष्य परिस्थितीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्या काळात अजितदादांनी शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य दिले. पिकांच्या नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे आणि पुनर्वसनाचा आढावा घेणे, यावर अजितदादांनी लक्ष केंद्रीत केले.

या जनसंवादात नागरिक, विविध शासकीय विभाग आणि नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर आले. व्हॉट्सअॅप चॅटबॉट्स, डिजिटल किऑस्क, हेल्पलाइन नंबर अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रारी नोंदविण्यात, पारदर्शकता ठेवण्यात आणि जबाबदारी ठरवण्यात भर देण्यात आला.

पिंपरीतल्या जनसंवादात तब्बल २५ हून अधिक शासकीय विभाग सहभागी झाले होते. नागरिकांच्या सुमारे ३,६०० तक्रारी नोंदविण्यात आल्या, त्यातील १,४०० तक्रारी जागेवरच सोडवल्या गेल्या. सामाजिक कल्याण, कचरा व्यवस्थापन, महसूल, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सार्वजनिक वाहतूकसंबंधीत प्रश्नांना प्राधान्याने उत्तरे देण्यात आली. स्वत: अजितदादांनी या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले, विभागांना तात्काळ उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन केले.

जनसंवादाच्या समारोपावेळी अजितदादांनी सांगितले, “ज्या तक्रारी मी ऐकू शकलो नाही, त्या तक्रारींची दखल मी स्वतः घेणार आहे आणि सर्वांना खात्री देतो की संबंधित समस्या नक्की सोडवल्या जातील. आज मुख्यमंत्री पुण्यात आहेत, त्यामुळे प्रोटोकॉलनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मलाही उपस्थित राहावे लागणार आहे.”

प्रत्यक्ष संवाद, तसेच डिजिटल साधनांच्या समन्वयाने हा उपक्रम विश्वासार्ह ठरत आहे. नागरिक आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यातील संवादाचा आणि विश्वासाचा बंध अधिक बळकट होत आहे, तसंच तक्रारींवरील कार्यवाही अधिक पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण ठरत आहे.

राज्यभर सुधारित नागरी सुविधा, लोकसहभाग वाढवणे व सुलभ प्रशासन यासाठी ‘जनसंवाद’ हा उपक्रम अजून व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.