ठरलं… सर्व महापालिका तिन्ही पक्ष महायुतीत लढणार

0
8

दि . २५ ( पीसीबी ) – राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी बाबत आजच्या महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. राज्यातील सगळ्या निवडणुका महायुतीने एकत्रच लढल्या पाहिजे असा सूर समन्वय समितीच्या सर्वच सदस्यांचा होता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. महायुतीत एकत्र लढले तर इच्छुकांची संख्या जास्त आणि वाट्याला येणाऱ्या जागा तुलनेने फारच कमी अशी परिस्थिती ओढवणार आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या माध्यमातून आपले प्राबल्य असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी केली जात होती. राज्य पातळीवर आता चर्चा झाली आहे. स्थानिक पातळीवर नंतर चर्चा होईल.

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली अशा ठिकाणी शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना महायुतीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल असं बोललं जात होतं. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार स्वबळाचा नारा देण्याच्या तयारीत आहेत. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये असं मत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नोंदवलं आहे.
या सगळ्या बातम्या समोर येऊ लागल्याने महायुतीत बिघाडी निर्माण होऊ नये याचा ही विचार केला गेला. शिवाय वेगवेगळे लढल्यास महायुतीलाच फटक बसू शकतो. त्यामुळे एकत्र लढलं पाहीजे असं ही मत काहींनी या बैठकीत व्यक्त केले आहे. एकीकडे समन्वय समिती एकत्र निवडणुका लढण्याच्या मानसिकतेत असली तरी, अनेक ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये टोकाचे वाद आहेत.
यासोबतच तळागाळात आपली ताकद टिकवून ठेवायची असेल तर लोकशाही प्रक्रियेत आपल्या स्थानिक कार्यकर्त्याला सहभागी करून घेणं हे प्रत्येक पक्षाला गरजेचे आहे. त्यामुळे महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना एकत्रित सामोर गेली तर मोठ्या प्रमाणात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बंडाळीला देखील महायुतीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मैत्रिपूर्ण लढतीचा पर्याय खुला ठेवला जावू शकतो. त्यातून आपापल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जावू शकते अशी ही शक्यता नाकारता येत नाही.

महायुती म्हणून निवडणूक लढवण्यावर भर
मिळालेल्या माहितीनुसार महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याकरिता काल (२५ जून) महायुतीच्या घटकपक्षांत चर्चा झाली. विधानसभेचा ट्रे़ंड राखण्यासाठी ही चर्चा होती, अशी माहिती शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच आणखी एक बैठक होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. सध्या पार पडलेली बैठक ही राज्य समन्वय समितीची होती. या बैठकीत स्थानिक नेत्यांना आदेश दिले जातात. अंतर्गत काही मतभेद असतील तर वरिष्ठ नेते लक्ष घालतील. ते स्थानिक नेत्यांची समजूत घालतील, असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुती म्हणून समोरे जाण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीचे सरकार आले, मतभिन्नता असू शकते, पण..
नकारात्मक विचार करू नका. विधानसभेत आमचे पटणार नाही असेच सर्वजण बोलत होते. चिट्टी काढणारा पोपट बोलत होता की महाविकास आघाडी बहुमतात विजयी होईल. पण त्याविरुद्ध सर्व झाले. महायुतीचे सरकार आले. मतभिन्नता असू शकते. स्थानिक पातळीवर प्रश्न सुटला नाही, तर राज्य पातळीवर सुटेल असेही शंभूराज देसेई यांनी सांगितले.

राज्य पातळीवर आता चर्चा झाली, आता…
अजित पवार यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांनीदेखील या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत खेळीमेळीच्या वातावरण चर्चा केली. विशिष्ट कालावधीत निवडणूक होईल. महायुतीसंदर्भात पुढच्या आठवड्यात पुन्हा चर्चा होईल. आजच्या बैठकीत महामंडळ वाटपाबाबत चर्चा झाली. विधानसभेच्या निवडणुकीवेळी वरिष्ठ नेते एकत्र बसले व मतदारसंघांचे वाटप झाले. तसाच निर्णय आताही होईल. राज्य पातळीवर आता चर्चा झाली आहे. स्थानिक पातळीवर नंतर चर्चा होईल. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे लोकभावनेचा आदर करून पुढे जाऊ, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली.