राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा – एकनाथ शिंदे

0
9

मुंबई दि . १६ ( पीसीबी ) | पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून रविवारी (15 जून) दुपारच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा या ठिकाणी असलेल्या पुलावर अनेक पर्यटक उभे असताना हा पूल अचानक कोसळला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 38 जणांना वाचविण्यात यश आले आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या अनेक तासांपासून एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

कुंडमळामध्ये ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत बचावकार्याला वेग देण्याचे, एनडीआरएफच्या तुकड्या, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि राज्यातील अशा जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले. याशिवाय या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच पर्यटनस्थळी विशेषता सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपातकालीन मदतीसाठीची यंत्रणा तत्पर ठेवावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूल घटनेसंदर्भात माहिती देताना सांगितले होते की, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. या दुर्घटनेत 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय मृतांच्या वारसाला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.