दि . १६ ( पीसीबी ) – महाराष्ट्रात संततधार पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना समोर आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढत असून, आतापर्यंत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्या घटनेत नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीत स्नान करताना पाच भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे.
मावळ पूल दुर्घटनेत ५१ जखमी, पावसामुळे बचावकार्यात अडथळे :
मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे काल रविवारी रात्री पुलाच्या ढासळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. रात्री १० वाजेपर्यंत सुरू असलेल्या सहा तासांच्या बचावकार्यात चार मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत ५१ नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत असून, सकाळी ७ वाजता पुन्हा हे कार्य सुरू करण्यात आले. मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप कोणताही पर्यटक बेपत्ता नसला तरी खबरदारी म्हणून शोधकार्य सुरू ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या पुलाला समांतर नवीन पुलासाठी १० जून रोजीच वर्क ऑर्डर निघाल्याचे मावळचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी सांगितले.