“हिंदू हिंदू काय म्हणताय? तिथे हिंदू-मुस्लीम सर्व भारतीय आहेत…

0
5

दि . २४ ( पीसीबी ) – जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातील लोकांमध्ये राग आणि दु:खाचं वातावरण आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावर समोर येणारे फोटो आणि व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारे आहेत. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीही या हल्ल्याविरोधात, दहशतवादाविरोधात आवाज उठवला आहे. अशातच अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेव्हा पत्रकार त्यांना पहलगाम हल्ल्याबद्दल प्रश्न विचारतो, तेव्हा ते त्याच्यावर भडकताना दिसत आहेत. त्याचसोबत त्यांनी या घटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ‘प्रोपोगंडा वॉर’ (प्रचारकी युद्ध) म्हटलंय.

व्हायरल व्हिडीओमध्ये शत्रुघ्न सिन्हा आधी विचारतात, “काय घटना घडली आहे?” त्यावर पत्रकार त्यांना सांगतो, “तिथे हिंदूंवर…” हे ऐकताच शत्रुघ्न त्याच्यावर भडकतात आणि म्हणतात, “हिंदू हिंदू काय म्हणताय? तिथे हिंदू-मुस्लीम सर्व भारतीय आहेत. ही गोदी मीडिया प्रमाणापेक्षा जास्तच चालवतेय. आमचे मित्र माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या गटाकडून हे प्रचारकी युद्ध जास्तच चालवलं जातंय. हे अती होतंय. हा मुद्दा संवेदनशील आहे हे मला मान्य आहे. त्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आपण असं कोणतंच वक्तव्य करू नये किंवा काही करू नये, ज्यामुळे तणाव आणखी वाढेल. सध्या जखमींवर औषधोपचाराची गरज आहे.”

शत्रुघ्न सिन्हा यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेकांनी त्यांना यावरून ट्रोल केलंय. काहींनी त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावरूनही टीका करण्यास सुरुवात केली आहे. ‘मग पीडित खोटं बोलतायत का’, असा सवाल एकाने केला. तर ‘सर्वांत आधी यांनाच धडा शिकवायला पाहिजे, जे आपले असून गद्दार आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. इतकंच नव्हे तर पर्यटकांना कुराणमधील कलमा म्हणण्यास सांगितलं गेलं. ज्यांना म्हणता आलं नाही, त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचं समजतंय. पहलगाममधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. 40 पर्यटकांना घेरून त्यांना लक्ष्य केलं.