घराघरांत जिजाऊ निर्माण झाल्या पाहिजेत! – सोनाली कुलकर्णी

bpcauthor bpcauthor
2 Min Read

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) : जिजाऊ माँसाहेब नसत्या तर शिवबा घडले नसते म्हणून घराघरांत जिजाऊ निर्माण झाल्या पाहिजेत!’ असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथे सोमवार, दिनांक १७ मार्च २०२५ रोजी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा मानपत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सोनाली कुलकर्णी बोलत होत्या. माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, सामाजिक कार्यकर्त्या कमल घोलप आणि मुख्य संयोजिका शर्मिला बाबर यांची व्यासपीठावर तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर महिलांची सभागृहात लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी माधुरी ओक, शारदा रिकामे, प्रगती नाडगौडा, अश्विनी कुलकर्णी, अंजली घारपुरे यांना मानपत्र, शाल, श्रीफळ प्रदान करून गौरविण्यात आले (अंजली घारपुरे यांच्या अनुपस्थितीत कातकरी समाजातील विद्यार्थिनींनी सन्मान स्वीकारला); तसेच ईश्वरी अवसरे या क्रिकेटपटू युवतीचा विशेष सन्मान करण्यात आला; तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना ‘प्राधिकरण कन्या’ म्हणून मानपत्र प्रदान करून खास गौरविण्यात आले.

सोनाली कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, ‘पंधरा ते पंचाहत्तर वयोगटातील या सर्व सन्मानार्थी महिला अभिनंदनास पात्र आहेत. जगभरातील मानसन्मानापेक्षाही घरातील हे कौतुक मनाला जास्त आनंद देणारे आहे!’ आपल्या मनोगताचा समारोप सोनाली कुलकर्णी यांनी ‘हिरकणी’ या स्त्रीजाणिवेच्या प्रेरणादायी कवितेने केला. सत्काराला उत्तर देताना माधुरी ओक यांनी, ‘शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक बांधिलकीतून काम करीत राहील!’ अशी ग्वाही दिली. शारदा रिकामे यांनी, ‘महिला, ज्येष्ठ आणि विशेष मुलांसाठी मोफत योगवर्ग चालवून मिळालेले समाधान अवर्णनीय आहे!’ अशी भावना व्यक्त केली; तर प्रगती नाडगौडा यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

गौरव सोहळ्यापूर्वी शब्दरंग कला साहित्य कट्टा या संस्थेतील महिलांनी वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले; तसेच सोनाली कुलकर्णी यांच्या आगमनप्रसंगी महिला लेझीमपथकाने त्यांचे उत्साहात स्वागत केले. विनिता श्रीखंडे, वृंदा गोसावी, संपदा पटवर्धन, सुचित्रा अधाटे यांनी मानपत्राचे वाचन केले. राजेंद्र बाबर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. ज्योती कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

Share This Article