पिंपरी चिंचवडमध्ये महामंडळाच्या मागणीसाठी रिक्षाचालकांचा आक्रोश मोर्चा

0
50

पिंपरी, दि. १० ऑगस्ट (पीसीबी) : प्रवाशांच्या सोयीचे वाहन म्हणजे रिक्षा. रिक्षाच्या माध्यमातून व्यावसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील 20 लाख रिक्षा चालकांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले असून त्यांना महामंडळ द्वारे सामाजिक सुरक्षा द्यावी, अपघाती विमा संरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी आज भक्ती शक्ती चौक शिल्पसमूह निगडी ते आकुर्डी चौक चिंचवड स्टेशन ते पिंपरी येथे रिक्षा चालकांनी रिक्षासह मोर्चा काढून आपल्या मागण्या बुलंद केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नॅशनल ट्रेडमॅन युनियन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे या मोर्चाचे आयोजन कामगार नेते राष्ट्रवादी संघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्व हे आंदोलन करण्यात आले.यावेळी यावेळी प्रदेश सरचिटणीस तुषार घाटूळे, संघटक धूराजी शिंदे, उपाध्यक्ष राजेश माने, सामाजिक कार्यकर्ते सचिन नागणे, सामाजिक न्याय अध्यक्ष मयूर जाधव, निमंत्रक नाना कसबे,माध्यम सचिव सुरज देशमाने, राजू बिराजदार,अविनाश बनसोडे,सचिन म्हेत्रे, किरण साडेकर,इरफान चौधरी , शमसुद्दिन शेख,रमेश बनसोडे ,मंगेश पलके,संतोष यादव,बंडू डोंगरे, अनिल गायकवाड,रमेश तळेकर,बबनराज नाटेकर,अनिल गायकवाड,सुनील डोंगरे,वसंत साळवे,लिंबाराज कांबळे, वसंत साळवेआदीसह पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

भक्ती शक्ती येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या आंदोलनाची सुरुवात झाली. तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला व समारोपप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मोठ्या घोषणा देत रिक्षाचालकांनी आपल्या मागण्या सरकार कडे मांडल्या.निगडी येथून टिळक चौक निगडी आकुर्डी खंडोबामाळ चिंचवड स्टेशन मोरवाडी तून पिंपरी चौकात समारोप करण्यात आला.

यावेळी नखाते म्हणाले की, अनेक वर्षांपासून रिक्षाचालकांच्या महामंडळाबाबत केवळ घोषणा होते मात्र पुढे काहीही होत नाही. नऊ वर्षांपूर्वी रिक्षा चालकांचे महामंडळ स्थापनेचा निर्णय झाला. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असताना पाच कोटी रुपये दिल्याचे जाहीर केले त्यानंतर रिक्षा चालकांसाठी अभ्यास समिती झाली त्याचा अहवालही आला. दोन वर्षांपूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही रिक्षा चालकांचे महामंडळ होईल असे जाहीर केले. मार्च 2024 मध्ये शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्र टॅक्सी, ऑटो रिक्षाचालक, मालक कल्याणकारी मंडळ या महामंडळाबाबत शासन आदेश काढले. मात्र प्रत्यक्षात रिक्षा चालकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम झाल्याचे नखाते म्हणाले.

पुढे बोलताना नखाते म्हणाले, आज रिक्षाचालकांचे प्रश्न गंभीर असून योग्यता प्रमाणपत्रासाठी दर दिवसाला 50 रूपये प्रमाणे अनेक रिक्षाचालकांना भुर्दंड भरावा लागलेला आहे, त्याचप्रमाणे रिक्षा खुले परमिट केल्यामुळे रिक्षाची संख्या अधिक झाल्याने व्यवसाय आज होत नाही. रिक्षाचालकांचे अपघाती मृत्यू होत असून त्यांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण नाही. रिक्षा चालकांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती मिळणे गरजेचे आहे. वयाच्या साठ वर्षे वयानंतर त्यांना पेन्शन योजना सुरू झाली पाहिजे, मात्र आभासी सरकार आभासी मंडळ आणि कधी होणार मंडळ अशी परिस्थिती सध्या राज्यांमध्ये आहे. सरकारने तातडीने महामंडळाची अंमलबजावणी न केल्यास लवकरच मुंबई येथे रिक्षा चालक, टॅक्सी चालकांचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला.