भक्तिभावाने ओतप्रोत वातावरणात ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ

0
206

विश्वामध्ये शांतीपूर्ण वातावरणासाठी अंतर्मनात शांती आवश्यक

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

(पीसीबी) -‘‘विश्वामध्ये शांतीसुखाचे वातावरण निर्माण व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. प्रत्येक मानवाने शांतीपूर्ण जीवन जगावे अशी सर्वांची इच्छा असते. वास्तविक पाहता हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्या अंतर्मनात शांती येईल.’’
उक्त उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी २८ ऑक्टोबर, २०२३ रोजी ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या शुभारंभाप्रसंगी मानवतेसाठी दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केले.

‘‘शांती-अंतर्मनाची’ या मुख्य विषयावर आधारित हा तीन दिवसीय संत समागम निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा, हरियाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. या संत समागमामध्ये देशाच्या कानाकोपऱ्या तून तसेच विदेशातील अनेक देशांतून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी झाले आहेत. भक्तिभावाने ओतप्रोत वातावरणात या संत समागमाचा आज भव्य शुभारंभ झाला.

सद्गुरु माताजींनी शांती या विषयावर बोलताना प्रतिपादन केले, की जर आपण स्वतःच अशांत आणि बेचैन असू, आमच्याच अंतर्मनात उलथा-पालथ होत असेल तर आपण कुठेही गेलो तरी आपल्याला शांती मिळणार नाही. जर खऱ्या अर्थाने आपल्याला शांती हवी असेल तर अगोदर आपण मानवी गुणांनी युक्त व्हावे लागेल. त्यानंतरच आपण अवघ्या विश्वासाठी वरदान ठरु शकतो. आपल्या मनात जर मानवतेचा भाव नसेल तर जीवनात शांती-सुख येऊ शकणार नाही.

शेवटी, सद्गुरु माताजींनी सांगितले, की जीवनात सर्वात मोठी शांती परमात्म्याला जाणून त्याच्याशी एकरुप होण्यामध्ये आहे. जेव्हा आपण परमात्म्याशी संलग्न होतो तेव्हा आपल्याला सदासर्वदा, सर्वत्र केवळ या प्रभू परमात्म्याचेच दर्शन घडत राहते आणि प्रेमभावाने युक्त होऊन मनामध्ये शांती धारण करुन त्याच्या लहरी आपण आपल्या कुटुंबात, प्रियजनांमध्ये, देशभरात आणि अवघ्या विश्वामध्ये पसरवत जाऊ शकतो.

दिव्य युगुलाचे भव्य आगमन
तत्पूर्वी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांचे दुपारी समागम स्थळी आगमन होताच संत निरंकारी मंडळाचे प्रधान श्री.सी.एल.गुलाटीजी व कार्यकारिणी समितीच्या अन्य सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच पुष्पहार घालून दिव्य युगुलाचे हार्दिक स्वागत केले. त्यानंतर हे दिव्य युगुल एका फुलांनी सुशोभित पालखीमध्ये विराजमान झाले आणि त्यांना समागमाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून समागम पंडालच्या मधून मुख्य मंचापर्यंत नेण्यात आले. यावेळी निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युज़िकल आर्टसच्या ११ शहरांतून आलेल्या मुलांकडून अभिनंदन गीत गायले जात होते. या पालखीसोबत संत निरंकारी मंडळाच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य तसेच केंद्रीय नियोजन तथा सल्लागार समितीचे सदस्य चालत होते.
दिव्य युगुलाला आपल्या दरम्यान पाहून समागम स्थळावर लाखोंच्या संख्येने उपस्थित श्रद्धालु भक्तांचा आनंदविभोर झाला आणि त्यांच्या नयनांतून आनंदाश्रू वाहू लागले. हात जोडून धन निरंकारच्या जयघोषात हे भक्तगण आपल्या हृदयसम्राट सद्गुरुचे अभिवादन करु लागले. भक्तांच्या अभिवादनाचा स्वीकार करत दिव्य युगुलही आपल्या सुहास्य वदनाने भक्तगणांना आपले पावन आशीर्वाद प्रदान करत होते.

निरंकारी प्रदर्शनी:
संत समागमामध्ये सत्संग पंडालच्या पाठीमागील बाजूस निरंकारी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये मिशनचा इतिहास, विचारधारा आणि मिशनचे देश-विदेशातील मानवतावादी सामाजिक कार्य यांचे सुरेख चित्रण माॅडेल्स, छायाचित्रे तसेच दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आले आहे. यावर्षी या प्रदर्शनीमध्ये नजर-ए-सुकून, दिदार-ए-सुकून, रहमतें-ए-सुकून, बहार-ए-सुकून, एतबार-ए-सुकून, उम्मीद-ए-सुकून आणि सुकून-ए-सद्गुरु अशी आठ दालने तयार करण्यात आली आहेत.
या व्यतिरिक्त यावर्षी प्रदर्शनीला ६ भागांमध्ये विभाजित करण्यात आले आहे ज्यामध्ये मुख्य प्रदर्शनी व्यतिरिक्त स्टुडिओ डिव्हाईन, बाल प्रदर्शनी, स्वास्थ्य व समाज कल्याण विभाग प्रदर्शनी, थिएटर आणिं डिजाईन स्टुडिओ इत्यादिंचा समावेश आहे.
समागमाच्या विधिवत शुभारंभापूर्वी २५ ऑक्टोबर रोजीच सद्गुरु माताजींच्या शुभहस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून ही प्रदर्शनी पाहण्यासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत