अमेठी गेली तर मग बारामती का नाही जाणार

0
225

पुणे, दि. २० (पीसीबी) – बारामती लोकसभा मतदार संघात आम्ही यावेळी असा उमेदवार देऊ की त्यांना कळणारही नाही बारामती कशी गेली”.असं सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ‘सरकारनामा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यभरात पदाधिकारी कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. बारामती लोकसभेसाठी भाजपचं गणित काय आहे, तिथे भाजपने कशी तयारी केली आहे, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या ताकदीचा, त्यांच्या विरोधात लढणारा उमेदवार भाजपला अजून मिळाला आहे की नाही, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, ”आम्ही अशावेळी उमेदवार देऊ की त्यांना कळणारही नाही बारामती कशी गेली. आमचा पक्ष वाढवण्यासाठी, आमचा उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही रणनीती आखत आहोत. पण शेवटी जनतेचा निर्णय आहे, त्यांनी सुप्रिया सुळेंना निवडून द्यायचं की भाजपच्या उमेदवाराला निवडून द्यायचं हा शेवटी जनतेचा निर्णय आहे. जर अमेठी जाऊ शकते तर बारामतीही जाऊ शकते. शेवटी तिथे त्यांचा पक्ष मजबूत आहे पण आम्हीही प्रयत्न करत आहोत. ज्या पद्धतीने आम्ही काम करतो. ज्या पद्धतीने चक्र फिरणार आहेत ते पाहता आम्ही बारामतीही जिंकू असा आमचा विश्वास आहे.”