खंडणी प्रकरणी १४ माथाडी कामगारांवर गुन्हा दाखल

0
216

गोडाऊनमध्ये माल उतरून घेण्यासाठी घेतली लाखो रुपयांची खंडणी

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – गोडाऊनमध्ये माल उतरून घेण्यासाठी प्रत्येक वाहन चालकाकडून पैसे घेत माथाडी कामगारांनी तब्बल चार ते सहा लाख रुपये खंडणी घेतली. हा प्रकार ऑक्टोबर २०२१ ते १० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत खराबवाडी येथील टोल इंडिया लॉजिस्टिक प्रा ली कंपनीत घडला.

नोंदणीकृत माथाडी कामगारांची टोळी क्रमांक ४०१ मधील माथाडी कामगार प्रभाकर रामदास तळेकर, कृष्णा बाबाजी चौधरी, राजेश किसन गुळवे, गणेश सिताराम जाधव, मोहन कोंडीबा थोरवे, प्रसाद जालींदर कदम, स्वप्नील दिपक टेमकर, बाळासाहेब सिताराम गाढवे, संजय यशवंत नाईकरे, नंदकुमार रामदास वायाळ, नवनाथ धोंडीभाऊ खंडागळे, मोहन दौलत बोंबे, सोमनाथ वसंत बोंबे आणि मुकादम प्रशांत बबन तळेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अभिजित धनंजय कुलकर्णी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोल इंडिया लॉजीस्टीक प्रा ली कंपनी खराबवाडी येथे येणाऱ्या आर एस ट्रान्सपोर्ट सितारगंज उत्तराखंड, आर साई ट्रान्सपोर्ट सितारगंज उत्तराखंड, तिरुपती लॉजीस्टीक होसुर, कर्नाटक व तिरुपती लॉजीस्टीक मुंबई, रजनी ट्रान्सपोर्ट बेंगलोर, अथर्व ट्रान्सपोर्ट रांजणगाव, अथर्व ट्रान्सपोर्ट भिवंडी मुंबई व इतर ट्रान्सपोर्टच्या वाहन चालकांकडून वरील माथाडी कामगारांनी वाहनांमधील माल खाली करण्यासाठी खंडणी घेतली. माथाडी कामगारांनी आजवर चार ते सहा लाख रुपये खंडणी घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.