प्राधिकरणात रंगले साठी ते नव्वदीतील जेष्ठांचे हास्य संमेलन

0
153

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – निगडी, प्राधिकरणातील जेष्ठ नागरिक संघ व नवचैतन्य हास्य योग परिवारातील सदस्यांचे ‘खान्देश मराठा मंडळ’ हॉलच्या भव्य लॉनवर शुक्रवारी सायंकाळी संमेलन पार पडले. संमेलनात प्राधिकरणातील ऐकून नऊ नवंचैतन्य हास्य योग परिवारातील सदस्यांनी सादरीकरण केले.

कार्यक्रमाची सुरूवात प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा चांदबी सैय्यद यांच्या प्रास्ताविकाने झाली. संघ सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, मधुमेहींसाठी व समाजातील गरजूनां रुग्णोपयोगी साहित्य अल्प दरात देणे अशा विविध उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व नव चैतन्य हास्य क्लबच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. गजानन उद्यान – अलका बेल्हेकर, दुर्गेश्वेर उद्यान – डॉ. म्हेत्रे, माऊली उद्यान – कुंदा एखंडे, स्वानंद – पुष्पा नगरकर, रेलविहार – भगवान महाजन, तुकाराम उद्यान – रामचंद्र कुंभार, दादा दादी उद्यान – शोभना जोशी, शुभम उद्यान – सोलारकर, ज्ञानेश्वर उद्यान – ज्ञानेश्वर खुळे.

या नंतर प्रत्येक हास्य क्लबच्या सभासदांनी नाट्य, कला, योग, आरोग्य संबधित गाणी,एकांकिका सोबत विनोदाच्या फैरी झाडून सर्व उपस्थित ज्येष्ठांची मनमुराद करमणूक केली.

माऊली उद्यानच्या सभासदांनी ‘ हसू चला जगू चला’ हे गीत , स्वानंदच्या सभासदांनी सासू सुनेवर आधरित गाण्याच्या थीम वर केलेले गाण्याला वन्स मोअर मिळाला.दुर्गेश्वर हास्य क्लबच्या महिला,पुरुष सभासदांनी ‘हास्य योगाचा मंत्र’ व बी पी शुगर घालवा संबधित ‘ही चाल तुरतुर’ या गाण्याच्या थीम मधील सादरीकरण लक्षवेधक ठरले. शिवाय, दादा दादी, तुकाराम बाग, गजानन बाग व रेल विहार मधील सभासदानी उत्कृष्ट सादरीकरण केले. शेवटी जगन्नाथ वैद्य यांनी योगाची महती पोवाडयाद्वारे सांगितली. कार्यक्रमाची सांगता करताना, महाराष्ट्र राज्य हास्य परिषदेचे अध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी आजच्या धकाधकीच्या व तणावग्रस्त जीवनात लोकांना हास्याचे महत्व विशद केले. मोठ्या कंपन्यात कामाचे तणाव कमी करून कार्यक्षमता वाढविण्यासाठी हास्य कार्यशाळा घेतल्या जातात. त्यानंतर नवचैतन्य हास्य संघाचे संस्थापक विठ्ठलराव काटे यांनी माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत चांगली तब्बेत रहाण्या करिता हास्य व योगा शिवाय पर्याय नाही हे उपस्थितांना पटवून दिले. हास्य क्लब हे समाजातील धर्म, जाती बाजूला सारून, देशाच्या विविधतेत एकता आणतात.

अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यात प्रामुख्याने रामानुंद मणियार, हरिष पाठक, दत्तात्रय कुंडले , तसेच प्राधिकरणामधील सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, माजी महापौर आर.एस. कुमार, माजी नगरसेविका शर्मिला बाबर,भारती फरांदे व या कार्यक्रमाचे प्रायोजक स्वीकारलेल्या माजी उपमहापौर शैलजा मोरे, अनुप मोरे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, संघाच्या कार्याध्यक्षा अर्चना वर्टीकर यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी केले. सरतेशेवटी संघाची प्रार्थना होऊन कार्यक्रमाची समाप्ती झाली. कार्यक्रमास 300 हून अधिक मान्यवर व ज्येष्ठांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या आयोजनात, आनंदराव मुळीक, शाम खवले, काशीनाथ पाटील, कुंदा कोळपकर यांनी सहभाग घेतला होता.