नदी प्रदुषण थांबवण्यासाठी जनमताचा दबाव निर्माण करण्याची गरज – रामदास जगताप,

0
333

पीसीबी टु़डे चे संपादक अविनाश चिलेकर यांचा पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्माण

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – नदीचे प्रदुषण थांबवायचे तर प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्ती तसेच जनमताचा दबाव निर्माण कऱण्याची गरज असल्याचे मत, पीएमआरडीए चे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी व्यक्त केले.

पवना जलदिंडी प्रतिष्ठानतर्फे चिंचवडगाव येथील पवना नदी किनाऱ्यावर बुधवारी (दि.२१) आयोजित जलदिंडी समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जलदिंडीचे मुख्य प्रवर्तक डॉ. विश्वास येवले, प्राचार्य व्यंकटेश भताने, बालभारतीचे संचालक शिवाजी तांबे, `पीसीबी टुडे`चे संपादक अविनाश चिलेकर, मुख्याध्यापिका हर्षा जोशी, लायन्स क्लब पुणे च्या अध्यक्षा दीपश्री प्रभू व्यासपीठावर होते. बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात `जलदिंडीची गोष्ट` हा धडा समाविष्ठ केल्याबद्दल श्री. तांबे यांनी जलमैत्री पुरस्काराने तर, पर्यावरण विषयक बातमीदारीसाठी श्री. चिलेकर यांनी पर्यावरण मित्र पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले. मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन दोघांना गौरविण्यात आले.

आपल्या भाषणात श्री. जगताप म्हणाले, मानव निर्मित प्रदुषण थांबवणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे अन्यथा पुढचा काळ कठिण आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने त्यासाठी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. नदी प्रदुषण करणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागतोय. पण या कायद्याची अंमलबजावणी करायला भाग पाडायचे असेल तर राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती बरोबरच जनमताचा दबाव निर्माण कऱणे गरजेचे आहे. नदी पूररेषेच्या बाबतीत पीएमआरडीए च्या विकास आराखड्यात (डिपी) कठोर धोरण तयार केले आहे, असेही ते म्हणाले.

प्रा. भताने यांनी जलदिंडी प्रवासाचा आढावा घेताना आता ही चळवळ व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाने नदी सुधार प्रकल्प तयार केला आहे, पण त्यासाठी आता आमची मनस्थिती सुधारण्याची गरज आहे. ही लढाई आहे आणि त्यासाठी आता संघर्षाची करावा लागेल.
श्री. तांबे यांनी बालभारतीच्या माध्यमातून आजवर ८० लाख शालेय विद्यार्थ्यांपर्यंत जलदिंडीचा धडा पोहचला. जवळपास शंभरावर शिक्षकांनी त्यावर स्वतंत्र व्हिडीओ तयार केले. यापुढे दरवर्षी २० लाख विद्यार्थी या जलदिंडीचा अभ्यास करणार आहेत, अशी माहिती दिली.

श्री. चिलेकर यांनी आपल्या भाषणात, भावी पिढीसाठी पवना नदीचे संवर्धन गरजे आहे, पण नदी वाचवायची असेल तर यापुढे शहरातील नागरिकांच्या मदतीने मोठा संघर्ष करावा लागेल, असे म्हटले. भराव टाकून नदीचा गळा घोटणारे, पूररेषा बदलणारे, सांडपाणी नदीत सोडणाऱ्यांच्यावर शहरातील संस्था, संघटना, लायन्स क्लब, रोटरी क्लब यांच्या माध्यमातून पहारेकऱी म्हणून काम करावे लागेल, असेही ते म्हणाले.

डॉ. येवले यांनी सर्वांचे स्वागत केले, तर सुर्यकांत मुथियान यांनी आभार प्रदर्शन केले. मनिषा हिंगणे आणि वर्षा लडकत यांनी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पवना माईची आरती होऊन कार्यक्रमाची सांगता कऱण्यात आली. आरतीसाठी भाजपचे चिंचवड विधानसभा निरीक्षक शंकर जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.